आवृत्ती पुणे
← Back to Homepage

पुणे जिल्ह्यात ग्रामीण पोलिसांकडून जमावबंदी अन् कलम 144 लागू

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • November 15, 2021

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिला आदेश : त्रिपुरा येथील हिंसाचाराचे पडसाद उमटले महाराष्ट्रात

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : त्रिपुरा येथील हिंसाचाराच्या घटनेनंतर याचे पडसाद महाराष्ट्रात उमटले आहे. या पार्श्वभूमीवर रझा अकादमीने 12 नोव्हेंबर रोजी पुकारलेल्या बंदला अमरावती, नांदेड, मालेगाव, पुसद आणि कारंजा या ठिकाणी दंगली उसळल्या आहेत.

अमरावती शहरात तीन दिवस संचारबंदी लागू केली आहे. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात रविवारी (दि. 14) ते शनिवार (दि. 20) या कालावधीत जमावबंदी (कलम 144) लागू करण्याचे आदेश दिले आहेत. रविवारी (दि.14) रात्री 12 ते शनिवार (दि.20) रात्री 12 या कालावधीत पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात जमावबंदी करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, कोणतीही व्यक्ती इन्स्टाग्राम, व्हॉट्सअप, ट्विटर, फेसबुक इत्यादी समाज माध्यमाद्वारे जातीय तणाव निर्माण करणाऱ्या गोष्टी पसरवण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच आक्षेपार्ह पोस्ट टाकणे किंवा शेअर करणे अशी कृत्ये केल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी ग्रुप अ‍ॅडमिनची राहणार आहे. समाज माध्यमांमध्ये चुकीची माहिती, अफवा जाणीवपूर्वक पसरवणे कायद्याने गुन्हा आहे. तसेच पाच व पाच पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येणे, सभा घेणे, जातीय तेढ निर्माण करणाऱ्या मजकुरांचे फ्लेक्स बोर्ड लावणे किंवा त्या प्रकारच्या घोषणा देण्यास मनाई करण्यात आली आहे. या आदेशांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेशात (Pune Crime) नमूद केले आहे.

get_footer();