मध्य रेल्वेच्या महाप्रबंधकांची बार्शी टाऊन रेल्वे स्थानकाला भेट
महाराष्ट्र न्युज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ
बार्शी : मध्य रेल्वेचे महाप्रबंधक राम करण यादव यांनी विभागीय व्यवस्थापक नीरज कुमार डोहरे यांच्या सोबत इतर अधिकाऱ्यांसह सोलापूर विभागातील लातूर रोड ते कुर्डूवाडी दौरा असताना बार्शी स्थानकाला भेट दिली, त्यांनी रेल्वे स्थानकाचे स्टेशन प्रबंधक कार्यालय, रेल्वे कॉलनी, प्रवासी सुविधा यांची पाहणी केली.
यादरम्यान रेल्वे प्रवासी सेल बार्शी यांच्या वतीने महत्त्वपूर्ण अशी निवेदने देण्यात आली. यामधे पुणे/मुंबईला अप डाऊन करणारे विद्यार्थी, नोकरदार, शेतकरी यांच्याकरिता दररोज लातूर ते मुंबई दरम्यान लातूरहून सकाळच्या सत्रात जनशताब्दी सोडणे,कन्फर्म तिकीट मिळत नसल्याने काही रेल्वे गाड्यांचा रिमोट/पुल्ड कोटा काढणे व जनरल कोटा लागू करणे,पुणे – हरंगुळ एक्सप्रेसच्या वातानुकूलित ३ टियर डब्यांना एसी चेअर कारचे तिकीटदर लावणे,पुण्यातून (दानापुर) पटणा एक्सप्रेस घेण्यासाठी हरंगुळ -पुणे एक्सप्रेस पुण्यात लवकर पोहोचवणे, अमृत भारत योजने अंतर्गत बार्शी स्थानकावर कोच इंडिकेटर,कवर शेड,पेड पार्किंगच्या सुविधा व रेल्वे पोलीस चौकी तैनात करणे,लातूर/बिदर -मुंबई एक्सप्रेसकरिता जास्त प्रवासी क्षमतेचे डबे बदलणे,मुरुड व महिसगावला क्रॉसिंग स्थानक म्हणून विकसित करणे,सोलापूर-तिरुपती व कोल्हापूर-नागपूर एक्सप्रेसची वारंवारीता वाढवणे,रेल्वे बोर्डाच्या आदेशाप्रमाणे अमरावती-पुणे(वाया)लातूर एक्सप्रेस सामान्य प्रवासी दर ठेवत कायमस्वरुपी करने बाबत मागण्या यावेळी करण्यात आल्या. यावेळी रेल्वे प्रवासी सेलचे पदाधिकारी शैलेश वखारिया,कनिष्क बोकेफोडे,अजित काळेगोरे, ग्राहक सेवा समितीचे श्री उकिरडे व इतर सदस्य उपस्थित होते.
