मध्य शहरातील हरवलेले १९३ मोबाईल मूळ मालकांना परत
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : परिमंडळ १ कार्यक्षेत्रातील खडक, समर्थ, फरासखाना, विश्रामबाग, शिवाजीनगर, डेक्कन पोलीस ठाण्यांच्या परिसरात हरवलेले/गहाळ झालेले १९३ मोबाईल एका कार्यक्रमात पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावळे यांच्या हस्ते मूळ मालकांना परत करण्यात आले.
खडक पोलीस ठाण्यातील ४० मोबाईल, समर्थ ५०, फरासखाना १९, डेक्कन ४०, शिवाजीनगर ३०, विश्रामबाग १४ असे एकूण १९३ मोबाईल हे सीईआर (CER) पोर्टलद्वारे महाराष्ट्रासह बाहेरील राज्यातूनही तांत्रिक विश्लेषणाद्वारे शोध घेऊन हस्तगत करण्यात आले होते.
शिवाजीनगर येथील मॉडर्न कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयातील स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर सभागृहात गुरुवारी झालेल्या कार्यक्रमात हे मोबाईल परत करण्यात आले.
या कार्यक्रमाला सहायक पोलीस आयुक्त साईनाथ ठोंबरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण, पोलीस निरीक्षक उत्तम नामवाडे, धनंजय पिंगळे आदी उपस्थित होते. सहायक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने यांनी प्रस्तावना केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषा निंबाळकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम गित्ते यांनी आभार मानले.