नऊ विद्यार्थी जखमी : उरुळी कांचनजवळील बोरीभडक गावातील घटना
महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क
पुणे : उरुळी कांचनमधील (ता. हवेली) शाळेत घेऊन येणार्या एका विद्यार्थी रिक्षाचा सोमवारी सकाळी अपघात झाला. या अपघातात रिक्षामधील ९ विद्यार्थी जखमी झाले आहेत. ही सर्व मुले बोरीभडक गावात राहणारी आहेत. रिक्षाचालकाच्या डोक्याला जखम झाली आहे.
लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी सांगितले की, उरुळी कांचनमधील महात्मा गांधी विद्यालयातील विद्यार्थ्यांना घेऊन रिक्षाचालक निघाला होता. बोरीभडक गावातील ७ मुली व २ मुले यांना रिक्षाचालकाने रिक्षात घेतले होते. सोलापूर रोडवरुन जात असताना रिक्षाचालकाचे नियंत्रण सुटले व रिक्षा रस्त्याच्या कडेला असलेल्या काटेरी झाडीत जाऊन धडकली. त्यात रिक्षामधील विद्यार्थ्यांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. रिक्षाचालकाच्या डोक्याला जखम झाली असून, सर्वांवर उरळीकांचन येथील एका हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत.
