महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : राज्यासह देशभरातील नागरिकांची फसवणूक करणाऱ्या सायबर भामट्यांच्या टोळीविरुद्ध पुणे शहर पोलिसांनी शुक्रवारी (दि.७ ऑक्टोबर) महाराष्ट्र गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केली. सायबर भामट्यांविरुद्ध कडक पावले उचलत केलेली देशभरातील ही पहिली कारवाई ठरली आहे. या कारवाईमुळे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता पुणे शहरातील ‘मोक्का’ कारवाईचे यांचे नाबाद शतक पूर्ण झाले असून, देशभरात पुण्याच्या या पॅटर्नचा अवलंब सुरू झाला आहे.
मोक्काबरोबरच महाराष्ट्र झोपडपट्टी दादाविरोधी कायद्यान्वये (एमपीडीए) अस्त्राचीही प्रभावी अंमलबजावणी प्रभावीरित्या सुरू असल्याने दिल्या दोन वर्षात संघटीत गुन्हेगारी नियंत्रणात आली मात्र यातील उगवत्या पिढीतील गंभीर गुन्ह्यांचा आलेख पोलिसांसमोर आव्हान ठरला आहे. शहरात सप्टेंबर २०२० पासून १०० टोळ्यांच्या सूत्रधारांसह ६७० गुंडानविरोधात पोलिसांनी ‘मोक्का’ची कारवाई केली. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ८० गुंडांची एमपीडीए’ अंतर्गत थेट कारागृहात रवानगी करण्यात आली. त्याचबरोबर २५० जणांना शहरातून तडीपार करण्यात आले. पुण्याच्या नाना पेठेतील बंडू अंधेकर, सूरज अडागळे, कोथरुड परिसरातील नीलेश घायवळ जमीन बळकावण्यासह खंडणी उकळल्याचे आरोप असलेला रवींद्र बऱ्हाटे बिबवेवाडीतील बापू नायर, येरवड्यातील आकाश कनचीले, नऱ्हे-आंबेगावमधील बंटी पवार, वारज्यातील जयेश लोखंडे या गुंडांचा व त्यांच्या टोळीच्याचा पोलिसांनी ‘मोक्का’ अन्वये केलेल्या कारवाईत समावेश आहे. त्यामध्ये मारामाऱ्या, दहशत माजवण्यापासून ते बेकायदा व्यवसाय करणाऱ्यांचा आणि अवैध व्यवसाय करणाऱ्यांचा प्रामुख्याने २१ ते २५ वयोगटातील युवकांचा समावेश आहे.
मोक्का कारवाईमुळे शहरातील संघटित गुन्हेगारीचा पूर्ण बिमोड झाल्याचा दावा पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी शुक्रवारी (दि.७) झालेल्या पत्रकार परिषदेत केला. त्याचबरोबर गंभीर स्वरूपाच्या गुन्हेगारातून निर्दोष सुटलेल्या व गुन्हेगारी प्रतिबंधक विभागात (पीसीबी) ‘निष्क्रिय’ अशी नोंद असलेल्या गुडांच्या रेकॉर्डची गोपनीय पद्धतीने पडताळणी करून कायदा व सुव्यवस्थेची परिस्तिथी अबाधित ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही पोलीस आयुक्त गुप्ता यांनी दिली. बाल गुन्हेगाराला अंकुश ठेवण्यासाठी त्याबाबतच्या कायद्याचे कडक पालन केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.
सक्रिय आणि निष्क्रिय गुंडांच्या टोळ्या
पुणे शहर गुन्हे अन्वेषण विभागाच्या गुन्हे प्रतिबंधक शाखेकडे संघटित टोळीतील अकरा गुन्हेगारीची टोळ्यांची नोंद आहे. त्यापैकी पंधरा वर्षांपूर्वी सर्वाधिक सक्रिय असलेल्या दोन टोळ्या आता ‘निष्क्रिय असल्याची नोंद आहे. कोथरूडमध्ये गजानन मारणे व नीलेश घायवळ तसेच कुप्रसिद्ध गुंड संदीप मोहोळच्या खून प्रकरणातील गणेश मारणे यांच्या टोळ्या सक्रिय आहेत. वडगाव बुद्रुकच्या तुकाईनगर परिसरात महेश उर्फ बंटी प्रकाश पवार, बिबवेवाडी भागात बापू प्रभाकर नायर यांच्या टोळ्या सक्रिय आहेत. निष्क्रिय असलेल्या टोळ्या छुप्या पद्धतीने सक्रिय असल्याची चर्चा पोलीस वर्तुळात आहे. मात्र, कोणत्याही टोळीची गय केली जाणार नाही, असा इशारा पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिला आहे.
टाडा ते मोक्का
यापूर्वी समाजविघातक कृत्ये करणाऱ्या गुंडाविरुद्ध राष्ट्रीय सुरक्षा कायदा (रासुका) आणि अतिरेकी व विध्वंसक कारवाया प्रतिबंधक कायद्यान्वये (टाडा) करण्याची तरतूद होती. बदलत्या काळात ‘रासुका’ चे रूपांतर एमपीडीए’ मध्ये व ‘टाडा’ चे रूपांतर ‘मोक्का’ मध्ये करण्यात आले. समाजाला उपद्रवकारक ठरणाऱ्या प्रत्येक गुंडाचा बंदोबस्त या कायद्यान्वये करता येऊ शकतो.
शहराच्या पोलीस आयुक्तपदाचा कार्यभार अमिताभ गुप्ता यांनी २० सप्टेंबरला २०२० ला स्वीकारला. गुन्हेगारी रोखण्यासाठी त्यांनी ‘मोक्का’, ‘एमपीडीए आणि तडीपारीच्या कारवाईचा बडगा उगारण्याचे आदेश दिले. त्यानंतर १०० टोळ्यांतील गुन्हेगारांविरुद्ध मोक्का लावण्याची ऐतिहासिक कामगिरी पोलिसांनी बजावली.
शहर गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे प्रतिबंधक विभागाच्या (पीसीबी) पोलीस निरीक्षक वैशाली चांदगुडे, शेखर कोळी, योगीराज घाटगे यांनी अविरत मेहनत घेऊन या कारवायांबाबतचे प्रस्ताव तयार केले. कायद्याच्या बडग्यामुळे यापूर्वी तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करणाऱ्या गुंड वर्थ डे बाईजपासून ते गाड्यांची जाळपोळ करणाऱ्या वृत्तींना आळा बसल्याचे निरीक्षण पोलिसांनी नोंदवले आहे.
