अभिनेत्री जयमाला इनामदारांसह विविध क्षेत्रातल्या व्यक्तींचा गौरव
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : प्रत्येकाकडे असलेली उत्तम कला, कौशल्य, वेगळेपण जोपासण्याची गरज आहे, त्यात आपले संपूर्ण आयुष्य बदलण्याची ताकद असते, असे प्रतिपादन जयमाला इनामदार यांनी केले.
सद्गुरु शंकर महाराज उपासना केंद्र, अंकुश मित्र मंडळ व ओंकार प्रतिष्ठान आयोजित शिवजन्मोत्सव – महाशिवरात्र उत्सव सोहळ्याचे औचित्य साधून कला, संगीत व रंगभूमीसाठी समर्पित भावनेने आयुष्य वेचणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री जयमाला प्रकाश इनामदार यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या.
जयमाला इनामदार व ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत वानखेडे यांच्या हस्ते डॉ. उज्वला हातागळे यांना राज्यस्तरीय प्रेरणा पुरस्कार तर नामदेव जाधव, गुलाबराजा फुळमाळी, शिवाजीराव कामथे, अनंत अगरखेडकर, ॲड. प्रशांत साळुंके, स्वाती डिंबळे, ॲड. विजय थोपटे, सागर शेलार या मान्यवरांना सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रातील कामगिरीसाठी प्रेरणा पुरस्कार देण्यात आला. पुरस्कार स्वीकारल्यानंतर भारावलेल्या जयमाला ताईंनी आपला कला जीवनाचा संपूर्ण प्रवास कथन केला.
याप्रसंगी नगरसेवक राजेन्द्र शिळीमकर, नगरसेवक दत्ता धनकवडे, गौरव घुले, बंडू नलावडे, जाणीव चे अध्यक्ष अमोल काटे, संदीप काळे, ॲड. वंदना थोपटे, शैलेश पाटील, संतोष पासलकर, दीपकबापू चव्हाण, किरण साबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी “प्रत्येक आईत असते जिजाऊ” या विषयावर चंद्रकांत दादा वानखेडे यांनी अनेक उदाहरणे देत आईची महती कथन केली. या व्याख्यानाला उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली.
समाजाच्या तळागाळातील घटकापर्यंत कवी, लेखक, कलाकार, खेळाडू व अभिनेते यांचा संघर्ष पोहोचला पाहिजे. त्यातून विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळेल व त्यांच्या आयुष्याला दिशा मिळेल, त्यासाठीच मागील पंचवीस वर्षे समिती असे उपक्रम आयोजित करीत आहे आणि त्याचे सकारात्मक परिणाम ही दिसून येत आहेत. असे मत या कार्यक्रमाच्या संयोजन समितीचे सदस्य कवी गोपाळ कांबळे यांनी मांडले.
उत्सव समितीने तीन दिवसीय महोत्सवाचे आयोजन केले होते. निमंत्रितांचे कवी संमेलन, महिला आरोग्य तपासणी, सांस्कृतिक – सांगितिक कार्यक्रम, व्याख्याने, महाप्रसाद अशा विविध कार्यक्रमांचा यामध्ये समावेश होता.
