50 लाख रूपयांची खंडणी न दिल्यास कुटुंबासह जिवे मारण्याची धमकी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : कात्रज हायवेवर मालकाची कार अडवून पन्नास लाख रूपयांच्या खंडणीसाठी चाकूचा धाक दाखवत धमकावणे तसेच व्हॉटस् अप कॉल करून फिर्यादी आणि कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या चार आरोपींना भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी अटक केली आहे.
सौरभ बनसोडे, वय 21 वर्षे, रा. वारजे, पवन कांबळे वय 22 वर्षे, रा. धायरी, संकेत जाधव वय 24 वर्ष, रा. नऱ्हे, कृष्णा भाबट वय 19 वर्षे रा. धायरी यांना अटक केली आहे.
गुन्ह्यातल्या आरोपींपैकी सौरभ बनसोडे, पवन कांबळे, संकेत जाधव हे तिघेही फिर्यादीच्या कंपनीत कामाला आहेत. मालकाच्या दैनंदिनीचे निरीक्षण करून त्यांनी खंडणी मागण्याचा कट रचला. एका साथीदाराच्या मदतीने कंपनीपासून पाठलाग करत चाकूचा धाक दाखवून धमकावले. त्यानंतर व्हॉटस अप कॉल वरून धमकावत 50 लाख रूपयांची खंडणी मागितली होती.
ही कारवाई, परिमंडळ २ च्या पोलीस उप आयुक्त स्मार्तना पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग नारायण शिरगावकर, यांच्या मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनमधील वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस उप निरीक्षक धिरज गुप्ता, पोलीस अंमलदार हर्षल शिंदे, सचिन गाडे, धनाजी धोत्रे, सचिन सरपाले, शैलेश साठे, चेतन गोरे, निलेश ढमढेरे, मंगेश पवार, अवधुत जमदाडे, अभिनय चौधरी, निलेश खैरमोडे, राहुल तांबे, विक्रम सावंत यांच्या पथकाने केली.
