पोलिसी दंडुका दाखवून शिस्त लावणार असल्याचा नूतन पोलीस निरीक्षक शेळके यांचा इशारा
पवन श्रीश्रीमाळ
महाराष्ट्र ३६० न्यूज
बार्शी : मराठवाड्याचे प्रवेशद्वार आणि भगवंताची नगरी असलेले बार्शी शहर हे शैक्षणिक व वैद्यकिय क्षेत्रातील प्रगत शहर आहे. शहरातील वाहतुकीची कोंडी फोडण्याबरोबरच बेशिस्त वाहनधारक व वाहनचालकांना पोलीस दंडुका दाखवून शिस्त लावणार असल्याचा इशारा नूतन पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांनी दिला आहे.
शहराची वाढत्या लोकसंख्येबरोबरच वाढती वाहनसंख्या व अपुरे रस्ते यामुळे शहरात वाहतुकीची नियमित कोंडी होते. शहरातील बाजारपेठेसह शहराला जोडणारे रस्ते तसेच अंतर्गत रस्त्यावर बेशिस्त वाहनचालकांमुळे सातत्याने वाहतुकीची कोंडी झालेली पहायला मिळते. वाहतुकीच्या कोंडीवर सातत्याने यापूर्वीही बार्शी नगर परिषद व शहर पोलीस प्रशासन यांच्यात संयुक्त बैठका झाल्या आहेत. या बैठकीत सुचविलेल्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी नागरिक, व्यापारी, वाहनचालकांकडून होताना दिसत नाही. त्यामुळे येरे माझ्या मागल्या या उक्तीनुसार शहरातील बिघडेलेली वाहतूक व्यवस्था व वाहतुकीची होणारी कोंडी काही केल्या फुटल नाही. त्यामुळे त्रस्त झालेले बार्शीकर कधी पोलीसांना तर कधी नगर परिषद प्रशासनाला दोष देताना दिसतात.
शहरातील अपुरे रस्ते व वाढलेले वाहनसंख्या याबरोबरच शहरात थेट येणारी जड वाहने यांमुळे वाहतुकीची कोंडी नेहमी होते. शहरातील नगर परिषद कार्यालय ते जुने पोलीस ठाणे इमारत या दरम्यान असलेल्या बाजारपेठेतील फुटपाथ हेदेखील पादचार्यांना चालण्यासाठी मोकळे नसतात. या फुटपाथवर व्यापार्यांनी आपले साहित्य ठेवत अतिक्रमण केल्याने फुटपाथ हे केवळ नावालाच उरले आहेत. व्यापार्यांनी केलेले अतिक्रमण काढण्यासाठी नगर परिषद प्रशासनाने अतिक्रमण हटाव मोहीम राबवली पाहिजे. बाजारपेठेत रस्ता दुभाजक करून सम-विषम तारखांना बाजारपेठेत पार्किंगची सोय केली पाहिजे. नो हॉकर्स झोनची प्रभावी अंमलबजावणी केली पाहिजे. तसेच बाजारपेठेत मालाची चढ उतार ही ठराविक दिवशी व ठराविक कालावधीत झाली पाहिजे. तसेच जड वाहनांना शहरात थेट प्रवेश न देता ती वाहने बायपासने शहराबाहेरूनच वळवली पाहिजे या उपाययोजनांची गंभीरपणे अंमलबाजवणी करण्यासाठी केवळ पोलीस किंवा नगर परिषद प्रशासनाला जबाबदार धरता येणार नाही, तर एक जागरूक नागरिक म्हणून ती प्रत्येक बार्शीकरांची ही तेवढीच जबाबदारी आहे.
मात्र, मागील अनेक वर्षापासून वाहतुकीची कोंडी फुटू शकली नाही. बार्शी हे मेडिकल हब असून सोलापूर व उस्मानाबाद या दोन्ही जिल्ह्यांतील तसेच राज्याच्या विविध भागांतील रुग्ण व त्यांचे नातेवाईक येथे उपचारासाठी येतात. रुग्णांची काळजी घेण्यासाठी अत्यवस्थ रुग्णाला शहरातून संबंधित हॉस्पिटलला नेण्यासाठी बर्याचदा शहरातील वाहतुकीच्या कोंडीचा मोठा फटका बसतो त्यामुळे रुग्ण प्रसंगी दगावण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अर्ध्या रात्रीदेखील मदत
नूतन पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांनी शहरातील बेशिस्त वाहतूक व वाहनचालकांना शिस्त लावण्याचा इशारा देत बार्शीकरांनी शहरातील कायदा सुव्यवस्था व शांतता अबाधित ठेवण्यासाठी अर्ध्या रात्रीदेखील दूरध्वनी करून सांगितले तरी आपण त्यांच्या सेवेला तत्पर राहू, अशी ग्वाही दिली आहे.
सद्रक्षणाय खल निग्रहणाय हे ब्रीद असलेल्या पोलीस खात्याची प्रतिमा कायम ठेवण्यासाठी प्रसंगी कठोर निर्णय घ्यावे लागले तरी चालतीत मात्र उत्कृष्ट पोलिसिंग करणार आहे. बार्शी शहराला नाहक बदनाम केले जात आहे. भगवंताची नगरी बार्शी ही अतिशय चांगले शहर आहे. या शहरात जातीयतेला थारा नसून सर्व भगवंताची लेकरे आहेत. त्यामुळे बार्शीकरांनो, ‘शिस्त पाळा, शहराला वाहतुकीच्या कोंडीतून मुक्त करा’ असे मी आपणास आवाहन करतो.
– नूतन पोलीस निरीक्षक रामदास शेळके

