बार्शी शहर पोलिसांचे अनोखे कार्य : आयुष्याला मिळाला नवा आधार
पुणे : पवन श्रीश्रीमाळ
महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क
सामाजिक कार्यकर्ते आणि बार्शी शहर पोलिसांच्या मदतीने बार्शी शहरातील एका पंधरावर्षीय अनाथ मुलाचे नुकतेच सोलापूर येथील बाल आश्रयगृहात पुनर्वसन करण्यात आले. अशी अनाथ मुले आढळल्यास त्याबाबत १०९८ या चाईल्ड हेल्पलाईन क्रमांकावरती संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शहरामध्ये अनाथ मुलगा आदित्य धनाजी जाधव, (वय १५, रा. मूळ वैराग, ता. बार्शी जि. सोलापूर) हा लॉकडाउनमध्ये शाळा बंद झाल्यामुळे बार्शी शहरात कोठेही हिंडत-फिरत होता. बार्शी येथील जागरूक नागरिक राज नानावटे, हेड कॉन्स्टेबल देशमुख मॅडम आणि इतर सामाजिक कार्यकर्ते यांना हा मुलगा फिरत असलेला व पावसात भिजत असलेला निदर्शनास आला. त्यांनी या मुलाला कुटुंबाविषयी चौकशी केली, तेव्हा मुलाने आई-वडील मयत झाले असून, तो अनाथ असल्याचे सांगितले.
बार्शी शहर पोलिस स्टेशन येथील हेड कॉन्स्टेबल देशमुख मॅडम यांनी त्या रात्री सदर मुलाची राहण्याची व्यवस्था राजमाता इंदुताई आंधळकर अन्नछात्रालय बार्शी येथे केली. दुसऱ्या दिवशी शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी कर्माचाऱ्यांना अनाथ मुलाच्या जवळच्या नातेवाइकांची चौकशी करण्याच्या सूचना दिल्या. चौकशी केल्यानंतर मुलाचे चुलतमामा लखन राम शेंडगे (रा. झाडबुके मैदान लहुजी चौक बार्शी) यांची माहिती मिळाली. लखन शेंडगे यांनी या मुलाचे आई-वाडील मयत झाले असून, त्यास जवळचे नातेवाईक नसल्याचे सांगितले. तसेच मुलाला सांभाळण्याकरिता आमची परिस्थिती नसल्याचे सांगितले. त्यामुळे शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी आणि बार्शी संरक्षण अधिकारी अमोल राजेंद्र जमदाडे, महिला व बालविकास विभाग बार्शी यांनी अनाथ मुलाचे सोलापूर येथील बाल आश्रयगृहात बालकल्याण समिती सोलापूर यांच्या मदतीने पुनर्वसन केले.
नागरिकांना आवाहन
या माध्यमातून समाजातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, आपल्या आसपास अशी अनाथ मुले दिसून आली, तसेच ज्या बालकांना काळजी व संरक्षणाची गरज आहे, असे जाणवल्यास अशा मुलांचे पुनर्वसन करणे ही आपल्या सर्वांची नैतिक जबाबदारी समजून १०९८ या चाईल्ड हेल्पलाईन नंबरवरती फोन करून सांगावे. त्यामुळे अशा अनाथ मुलांचे भविष्य उज्ज्वल होण्यास व एक चांगला समाज घडवण्यास मदत होईल.
– संतोष गिरीगोसावी, पोलिस निरीक्षक, बार्शी शहर
