भारती विद्यापीठ पोलिसांनी पतीला केली अटक
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पाणीपुरी न विचारता आणल्याच्या वादातून पत्नीने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे. दोन दिवसांपूर्वी पाणीपुरीवरून वाद झाल्यानंतर तिने विषारी औषध प्राशन केले होते. शनिवारी (दि. २८ ऑगस्ट २०२१) दुपारी दोन उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
प्रतिक्षा गहिनीनाथ सरवदे (वय-23 रा. फ्लॅट नं.202, सिंहगड व्हिला, आंबेगाव पठार) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी प्रतिक्षाचे वडील प्रकाश प्रभाकर पिसे (वय 55, रा. सरकारी दवाखान्यामागे, बीड) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली, त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
पती गहिनीनाथ सरवदे (वय-33) याला भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमधील पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती गहिनीनाथ हा मुळचा सोलापूर जिल्ह्यातील असून त्यांचा विवाह 2019 मध्ये प्रतिक्षासोबत (मुळ रा. बीड) झाला होता.
त्यांना एक मुलगा आहे. गहिनीनाथ हा उच्चशिक्षीत असून, तो पुण्यातील एका मोठ्या कंपनीत नोकरीला आहे. लग्नानंतर प्रतिक्षा सासरी राहत होती. यावरून त्यांच्यात वाद होत होते. काही दिवसांपूर्वीच गहिनीनाथ याने पत्नीला पुण्यात आणले होते. ते दोघेही आंबेगाव पठार येथे राहत होते. घटनेच्या दोन दिवसापूर्वी गहिनीनाथ याने ऑफिसवरून येताना पाणीपुरीचे पार्सल आणले होते. त्यावेळी मला न विचारता पाणीपुरी आणल्याच्या रागातून प्रतिक्षाने पाणीपुरी खाण्यास नकार दिला.
पाणीपुरी आणण्यावरुन दोघांमध्ये वाद झाले. यानंतर पतीने कामावर जाताना डबा नेण्यास नकार दिला. यातूनच प्रतिक्षाने विषारी औषध प्राशन केले. तिला गंभीर अवस्थेत एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, शनिवारी (दि.28) दुपारी तीनच्या सुमारास प्रतिक्षाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस करीत आहेत.
