आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

खंडणी उकळणारे कथित ‘मानवाधिकार’चे सातजण पोलिसांच्या जाळ्यात

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • September 13, 2021
Spread the love

वाकड पोलिसांत गन्हा दाखल : दुकानदारावर रूबाब करण्यासाठी पोलिसांना बोलावले अन् स्वतःच अडकले

पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

मानवाधिकार व भ्रष्टाचार निवारण संघटनेचे पदाधिकारी असल्याचे सांगून किराणा दुकानदाराला भेसळ करता म्हणून धमकाविले. रुबाब दाखविण्यासाठी त्यांनी पोलिसांना पाचारण केले. पण, तो डाव त्यांच्यावरच उलटला. पोलिसांनी खंडणी उकळणार्यावर या कथीत मानवाधिकार व भ्रष्टाचार निवारण संघटनेच्या ७ पदाधिकार्यांना अटक केली आहे.

हेमंत निवगुणे, कपिल राक्षे, आदित्य जेधे, तानाजी मस्तुद, किरण घोलप, सतीश केदारी, ज्योस्त्ना पाटील अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी सुरजाराम रुपाराम चौधरी (वय ३७, रा. तळेगाव दाभाडे) यांनी वाकड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौधरी यांचे रहाटणी येथील रामनगरमध्ये बालाजी ट्रेडर्स या नावाचे किराणा दुकान आहे. त्यांच्या दुकानात १० सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ७ जण आले. आम्ही मानवाधिकार व भ्रष्टाचार निवारण संघटनेचे पदाधिकारी असल्याचे त्यांनी चौधरी यांना सांगितले. तुम्ही धान्यात भेसळ करता अशी आमच्याकडे माहिती आहे. तुम्हाला आणि तुमच्या भावाला १० वर्षे जेलमध्ये पाठवू, अशी धमकी त्यांनी दिली. जेलची हवा टाळायची असेल तर २५ लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगितले.

चौधरी यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर त्यांनी त्यांच्या भावाच्या खिशातील ८ हजार ५०० रुपये जबरदस्तीने काढून घेतले. त्यानंतर ते शनिवारी पुन्हा आले. त्यांनी २ लाख रुपये द्या नाही, तर पोलिसांना बोलावतो, असे सांगितले. त्यांच्यावर रुबाब दाखविण्यासाठी त्यांनी पोलिसांना बोलावले. वाकड पोलीस तातडीने दुकानात आले. तेव्हा चौधरी यांनी आपल्याकडे हे खंडणी मागत असल्याचे सांगितले. भावाच्या खिशातील ८ हजार ५०० रुपये घेऊन गेल्याचे सांगितले. त्यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी सातही जणांना अटक केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.