भारती विद्यापीठ पोलिसांची कामगिरी : २०२० पासून टोळीने केले विविध प्रकारचे गंभीर गुन्हे
पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
भारती विद्यापीठ पोलिसांनी विविध प्रकारचे गंभीर गुन्हे करणाऱ्या सार्थक मिसाळ गँगविरुद्ध ‘मोक्का’अंतर्गत कारवाई करत एकूण आठ जणांना ताब्यात घेतले आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी कार्यभार घेतल्यानंतर ‘मोक्का’अंतर्गत केलेली ही ५३वी कारवाई आहे.
दिनांक २२ ऑगस्ट रोजी रात्री सव्वाआठच्या सुमारास टोळीप्रमुख सार्थक मिसाळ आणि त्याच्या साथीदारांनी जुन्या भांडणाचा राग मनात धरून फिर्यादी आकाश अरुण पवार (वय २४, रा. जांभुळवाडी रोड, आंबेगाव बुद्रुक, पुणे) यास गैरकायद्याची मंडळी जमवून लोखंडी कोयत्याने वार करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला व परिसरामध्ये वाहनांची तोडफोड करून हत्याराच्या मदतीने दहशत माजविली. म्हणून नमुद फिर्यादीचे फिर्यादीवरून भारती विद्यापीठ पोलीस ठाणे येथे २३ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दाखल गुन्ह्याचे तपासामध्ये टोळीचा म्होरक्या सार्थक संगीत मिसाळ (वय २०, रा. मानाजी नगर, नऱ्हेगाव, पुणे) आणि अजय उर्फ शुभम रवींद्र हिरे (वय २३, रा. शनिनगर चौक, जांभुळवाडी रोड, आंबेगाव खुर्द, पुणे) यांना २३ ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली आहे, तसेच तुकाराम रामचंद्र येनपुरे उर्फ वस्ताद (वय ५२, रा. आंग्रे) यांच्या फ्लॅटमध्ये भाड्याने राहणारे, तुषार प्रकाश डोंबे (वय २१, रा. शनिनगर चौक, जांभुळवाडी रोड, पुणे, लकी उर्फ लखन अरुण गायकवाड (वय १९, रा. अचल फार्म सोसायटी, कात्रज, पुणे), तेजस उर्फ बंटी तुकाराम येनपुरे (वय २०, रा. जांभुळवाडी रोड, आंबेगाव खुर्द पुणे), आदित्य उर्फे बबलु जगमोहन सिंन्हा (वय १९, दत्तनगर, आंबेगाव खुर्द, पुणे) आणि कल्पेश अनिल चव्हाण (वय ३२, रा. दत्तनगर, आंबेगाव खुर्द, पुणे) यांना दि २४ ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली आहे.
नमुद सार्थक मिसाळ टोळीवर सन २०२० पासून संघटितपणे गंभीर स्वरूपाचे शरिराविरुद्धचे व मालमत्तेविरुद्धचे गुन्हे दाखल असून टोळीचा म्होरक्या सार्थक संगीत मिसाळ याने प्रत्येक गुन्ह्याचे वेळी सोबत वेगवेगळे साथीदार घेऊन आपल्या टोळीची दहशत व वर्चस्व राखण्याकरीता तसेच स्वतःचे व टोळीचे अवैध आर्थिक फायद्याकरीता जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न, दरोडा, अपहरण, बेकायदा घातक शस्त्र जवळ बाळगणे सन २०२० पासून, दहशत माजविणे, बेकायदेशीर जमाव जमवीणे यासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे चढत्या क्रमाने केलेले आहेत.
सदर टोळीप्रमुख व त्याचे टोळीचे सदस्य यांना गुन्हेगारी कृत्यांपासून परावृत्त करण्याच्या उद्देशाने त्याचेवर यापूर्वी प्रतिबंधक कारवाई तसेच हद्दपारीसारखी ठोस कारवाई करूनदेखील त्यांचे गुन्हेगारी वर्तनात काही एक चांगला परिणाम झालेला नसल्याने त्यांचेवर ठोस व कडक कारवाई करणे आवश्यक होते.
वरील सक्रिय गुन्हेगारी टोळीवर भारती विद्यापीठ पोलीस ठाणे येथे दाखल असणारे गुन्ह्यास मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई होण्याकरिता प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी पोलीस उपआयुक्त सागर पाटील यांच्या मार्फतीने अप्पर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे यांना सादर केला होता. सदर प्रस्तावाचे अवलोकन करून अप्पर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे यांनी आरोपी सार्थक संगीत मिसाळ याच्या टोळीविरूद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अन्वये कारवाई होण्याकरिता मंजुरी दिली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण करीत आहेत.
सदरची कामगिरी ही, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे, पोलीस उपआयुक्त सागर पाटील, पोलीस उपआयुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संगीता यादव आणि विजय पुराणीक, सर्व्हेलन्स पथकातील सहा पोलीस निरीक्षक गंगाधर घावटे व पोलीस अंमलदार कृष्णा बढे, चंद्रकांत माने, महेश बारवकर, नीलेश ढमढेरे व अमित शेडगे यांनी वेळेत तयार करून कोणत्याही त्रुटीविना वरिष्ठ कार्यालयास सादर करून केली आहे.
‘मोक्का’अंतर्गत ५३ कारवाया
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी कार्यभार घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देऊन शरिराविरुधद्ध व मालमत्तेविरुधद्ध गुन्हे करणारे व लोकांमध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचाली वर बारकाईने लक्ष ठेवून गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन होईल यावर भर देण्याबाबत सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश देण्यात आले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मोक्का’अंतर्गत आतापर्यंत ५३ कारवाया करण्यात आलेल्या आहे.
