डॉ. कौस्तुभ राडकर : समर्थ पोलीस स्टेशनमध्ये तज्ज्ञांचे आरोग्याविषयक व्याख्यान
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
प्रत्येकाने स्वतःसाठी वेळ देऊन दररोज किमान एक तास व्यायाम करून आरोग्य सुदृढ राखले पाहिजे. पोलिसांचे आरोग्य सुदृढ असेल, तरच समाजाचे आरोग्य सुदृढ राहील. आयर्नमॅन स्पर्धेसाठी सायकलिंग, स्वीमिंग आणि रनिंग एकाच वेळी १६ तासांमध्ये पूर्ण करणे आवश्यक असते. त्यासाठी नियमित व्यायाम आणि संतुलित आहार ही महत्त्वाचा आहे, असे २८ वेळा आयर्नमॅनचा किताब पटकावलेले डॉ. कौस्तुभ राडकर यांनी सांगितले.
समर्थ पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी फिटनेसविषयी पुण्यातील आयर्नमॅन विजेत्यांचे मार्गदर्शन आयोजित केले होते. यावेळी २८ वेळा आयर्नमॅन विजेते डॉ. कौस्तुभ राडकर (वय ३५), सहा वेळा आयर्नमॅन विजेते उद्योजक दशरथ जाधव (वय ६४), दोन वेळा आयर्नमॅन विजेते डॉ. राहुल झांजुर्णे (वय ४२) आणि पहिल्यांदाच आयर्नमॅनचे विजेते मानकरी हेमंत परमार यांचा विशेष सन्मान पोलीस उपायुक्त डॉ. प्रियंका नारनवरे यांच्या हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी समर्थ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे, पोलीस निरीक्षक उल्हास कदम, संदीप जोरे, हेमचंदर खोपडे, ज्योति कुटे, मीरा त्र्यंबके आणि पोलीस अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. यावेळी समर्थ पोलीस स्टेशनमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या अंमलदार रणजित उबाळे, संतोष काळे, सुशील लोणकर, जितेंद्र पवार, सुभाष पिंगळे, हेमंत पेरण, शुभम देसाई, सुभाष मोरे, नीलेश साबळे, सुमीत खुट्टे, विठ्ठल चोरमले, महेश जाधव, धीरज शिंदे, महिला पोलीस नाईक वनिता गोरे यांच्यासह कोरोना महामारीमध्ये पोलिसांना व नागरिकांना मदत करणाऱ्या २० पोलीस मित्रांचा सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
उद्योजक आयर्नमॅन दशरथ जाधव म्हणाले की, उद्योग-व्यवसायाचा व्याप सांभाळत ५६ व्या वर्षी व्यायामाला सुरुवात केली. डॉ. राडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयर्नमॅन स्पर्धेसाठी तयारी करत असून, ६४ व्या वर्षीदेखील उत्तम आरोग्य आहे. पोलिसांनीदेखील स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देऊन व्यायामासोबत योग्य आहार घेणे गरजेचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
आयर्नमॅन हेमंत परमार म्हणाले की, तीन वर्षांपूर्वी माझे १०६ किलो वजन होते. मात्र, व्यायाम आणि योग्य आहारामुळे आता ६६ किलो असल्याचे सांगून त्यांनी आरोग्याविषयी काळजी घ्या असे सांगितले.
हडपसरमधील आयर्नमॅन अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. राहुल झांजुर्णे म्हणाले की, आजाराबाबतची माहिती सांगून कोणताही नवीन उपक्रम, कामगिरी सुरू करताना प्रत्येकजण वेगवेगळ्या प्रकारची कारणे सांगून नवीन कामगिरी करण्याचे टाळतात. मात्र, कोणत्याही आव्हानावर मात करण्याची तयारी केली, तर नवीन उर्जा, चैतन्य व्यायामातून मिळते. मी स्वतः वैद्यकीय व्यवसायात व्यस्त आहे. मात्र, आयर्नमॅनची तयारी करून स्पर्धेत सहभागी झालो. कारणे सांगण्यापेक्षा त्यावर मात करायला शिकले पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.
