500 रुपयांच्या दंडाची आकारणी : महामार्ग पोलीस उपनिरीक्षक सुरेश गीते यांची माहिती
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
बीड : बीड जिल्ह्यातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी 01 ऑक्टोबर 2021 पासून हेल्मेट वापरण्याची सक्ती करण्यात आली असून, हेल्मेट नसलेल्या वाहनचालकांना 500 रुपयांच्या दंडाची आकाराणी करण्यात येणार असल्याचे महामार्ग पोलीस उपनिरीक्षक सुरेश गीते यांनी सांगितले.
महामार्ग पोलिसांच्या वतीने सर्व राज्य महामार्ग तसेच राष्ट्रीय महामार्गावर हेल्मेट परिधान न केलेल्या दुचाकी वाहनचालकांवर विनाहेल्मेटच्या केसेस करून 500 रुपयांचा दंड केला जाईल, अशी माहिती मांजरसुंबा महामार्ग पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सुरेश गीते यांच्या वतीने देण्यात आली.
बीड जिल्ह्यातील सर्व राज्य तसेच राष्ट्रीय महामार्ग मागील आठ महिन्यांपासून महामार्गावर एकूण 134 प्राणांकित अपघात होऊन 140 व्यक्ती मृत्यू पावल्या आहेत. यातील अपघातात जास्तीत जास्त मोटरसायकलवरील इसम मृत्यू पावले आहेत. याचे मुख्य कारण जास्त गतीने व हयगयीने वाहन चालवणे, नशा करून वाहन चालवणे, वाहन चालवताना मोबाइलवर बोलणे, विरुद्ध दिशेने वाहन चालवणे, कार असेल तर सीटबेल्ट न लावणे, दुचाकीस्वारांनी रस्त्याच्या मधोमध वाहन चालवणे हे आहे.
रस्त्याने पायी चालणाऱ्यांनी केव्हाही तसेच रात्री-अपरात्री डांबरी रस्त्याच्या अगदी खाली चालू नये. मुख्यत: दुचाकीस्वार हे रस्त्याचे एकदम कडेने दुचाकी चालवत नसून, काही दुचाकी रस्त्याचे मधोमध चालवताना दिसतात, तसेच जास्त वेगाने चालवतात. एकही दुचाकीस्वार हा हेल्मेट घालून वाहन चालवत नाही, त्यामुळे दुचाकीचा जर अपघात झालाच तर डोक्याला मार लागून जखमी होऊन जीव जाण्याचा जास्त संभव असतो. जर हेल्मेट असेल तर डोक्याला मार न लागल्याने फक्त जखमी होऊन जीव वाचण्याची जास्त श्यक्यता असते.
दिनांक 01 ऑक्टोबर 2021 पासून रोज महामार्ग पोलिसांच्या वतीने सर्व राज्य महामार्ग तसेच राष्ट्रीय महामार्गावर हेल्मेट परिधान न केलेल्या दुचाकी वाहनचालकांना विनाहेल्मेटच्या केसेस करून दंड केल्या जातील, ज्याचा दंड 500 रुपये आहे. नागरिकांना दुचाकीवर असताना बसलेल्या सर्व व्यक्ती हेल्मेट परिधान करूनच दुचाकी चालवावी आणि स्वतःच्या जिवाची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
- सुरेश गीते, पोलीस उपनिरीक्षक, महामार्ग पोलीस स्टेशन, मांजरसुंबा
