समर्थ पोलिसांची कामगिरी : दोन रिक्षा, एक दुचाकी जप्त
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे – कोंढव्यातील भाग्योदयनगर भागात सापळा रचून समर्थ पोलिसांनी सराईत वाहनचोरास चोरीच्या रिक्षासह अटक केली. त्याच्याकडून समर्थ, खडक आणि भोसरी पोलीस ठाण्यात दाखल वाहनचोरीचे तीन गुन्हे उघडकीस आणून रास्ता पेठ आणि भवानी पेठेतून चोरलेल्या दोन रिक्षा आणि एक दुचाकी अशी तीन वाहने हस्तगत केली आहेत.
वसिम वाजिदअली अन्सारी (वय 29,रा. भाग्योदयनगर कोंढवा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी सांगितले की, रास्ता पेठेतून काही दिवसांपूर्वी रिक्षा चोरी झाली होती. याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली होती. तपास करीत असताना पोलिसांनी परिसरातील सीसीटिव्ही फुटेजद्वारे रिक्षा चोरी करणारा संशयित व्यक्ती कोंढव्यातील भाग्योदयनगर येथे राहत असल्याची माहिती सूत्रांकडून पथकास मिळाली.
समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांच्या मार्गदर्शनानुसार सहायक निरीक्षक संदिप जोरे, पोलीस हवालदार संतोष काळे, सुशील लोणकर, सुभाष पिंगळे, शुभम देसाई, विठ्ठल चोरमले, निलेश साबळे, हेमंत पेरणे आदींच्या पथकाने कोंढव्यात सापळा लावला. दरम्यान, चोरीला गेलेल्या रिक्षातून आरोपी वसिम जाताना दिसताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीमध्ये त्याने ती रिक्षा रास्ता पेठेतून चोरी केल्याची कबुली दिली.
समर्थ पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात अटक करून त्याच्याकडे अधिक तपास केला असता त्याने जुना मोटार थांबा, भवानी पेठेतून आणखी एक रिक्षा तसेच भोसरी उड्डाणपूलाशेजारील आळंदी रस्त्यावरील माई वडेवाले या दुकानासमोरून एक दुचाकी चोरी केल्याची माहिती दिली.
