सांगवी पोलिसांत दिली फिर्याद : खोट्या तक्रारीत अडकविण्याची दिली होती धमकी
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : लग्नानंतर हुंड्याच्या कारणावरुन किंवा व्यवसायासाठी पैसे आणण्याच्या कारणावरुन विवाहितेचा छळ केला जात असल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. सततच्या होणाऱ्या त्रासाला वैतागून विवाहित महिला टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या करतात. मात्र, पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीनेच आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिचंवडमध्ये जुनी सांगवी येथील ढोरे नगर येथे 2 ऑक्टोबर रोजी घडली आहे.
प्रसाद उमेशराव देशमुख (वय-३४, रा. ढोरे नगर, जुनी सांगवी) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी मयत प्रसादच्या आईने सांगवी पोलीस ठाण्यात सोमवारी (दि.23) फिर्याद दिली आहे. आईच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी पत्नी, सासू, विशाल राजेंद्र (सर्व रा. सुभाष नगर, येरवडा, पुणे) यांच्या विरोधात 306, 504, 506,34 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांचा मुलगा प्रसाद याला खोट्या तक्रारीत अडकवण्याची व मुलाचे तोंड पाहू देणार नाही, अशी धमकी दिली. तसेच तुझ्या नातेवाईकांशी कुठलाही संबंध ठेवू नये, यासाठी दबाव टाकला. तू मर तू मर, असे म्हणून आरोपी पत्नीने त्रास दिला. शिवीगाळ करुन दमदाटी केली. वारंवार होणाऱ्या त्रासाला वैतागून प्रसादने 2 ऑक्टोबर रोजी सकाळी सव्वासहा वाजता आत्महत्या केल्याचे फिर्यादीने तक्रारीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक के.एस गवारी करीत आहेत.
