आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

माजी खासदार ईश्‍वरबाबुजी जैन यांची २४ कोटीत फसवणूक

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • November 1, 2021
Spread the love

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

जळगाव : उसनवारीने घेतलेले पैसे परत केले नाही, मुदतीची मागणी करुन पैसे देण्यास टाळाटाळ केली तसेच वादग्रस्त जमिनीची माहिती लपवून ठेवत त्याबाबत करारानामा करण्यास भाग पाडून नाशिक येथील अशोका बिल्डर्स व डेव्हलपर्स यांनी माजी खासदार ईश्वरलाल जैन यांची २४ कोटी ६३ लाख १६ हजार ९५१ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी अशोका बिल्डर्सचे मालक अशोक मोतीलाल कटारिया, स्नेहल सतीश पारख उर्फ स्नेहल मंजीत खत्री, सतीश धोंडूलाल पारख, आशिष अशोक कटारिया व राजेंद्र चिंधूलाल बुरड (सर्व रा.नाशिक) यांच्याविरुध्द बुधवारी रात्री शनी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

माजी खासदार ईश्वरलाल जैन यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, नाशिक येथील अशोका बिल्डर्सचे मालक अशोक कटारिया यांच्यासह पाच जणांनी ईश्वरलाल जैन यांच्याकडून २०१०-११ ते २०१४-१५ या काळात ११ कोटी रुपये व १९ कोटी २४ लाख ६० हजार १२५ रुपये हातउसनवारीने घेतले. त्यातील काही रक्कम या लोकांनी जैन यांना परत केली. उर्वरित ६ कोटी ९९ लाख ३६ हजार ७४१ व १७ कोटी ६३ लाख ८० हजार २१० अशी एकूण २४ कोटी ६३ लाख १६ हजार ९५१ परत मागण्यासाठी तगादा लावला असता त्यांनी मुदतीची मागणी करुन रक्कम देण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर राजेंद्र बुरड व स्नेहल पारख यांनी ६ कोटी ९९ लाख ७४१ रुपये देण्यास मुदत मागून जॉईंट व्हेंचर ग्रीमेंट तयार करु असे सांगून काही दस्ताऐवज आणले. हे दस्ताऐवज रक्कम परत करण्यास मुदतवाढीचे होते. त्यानंतर १७ कोटी ६३ लाख ८० हजार २१० च्या थकबाकीपोटी देखील संयुक्त करारनामा तयार करुन आणला.

या सर्व लोकांवर विश्वास ठेऊन या करारावर आपण सह्या केल्या, असे जैन यांनी नमूद केले आहे.मानराज मोटर्सच्या नावानेही करार याच काळात मानराज मोटर्स कंपनीला २५ कोटी रुपये तात्काळ देणे असल्याने जैन यांनी रक्कम परत करण्याबाबत पुन्हा या लोकांकडे तगादा लावला. ही संधी साधून दोन्ही जॉईंट व्हेंचर ग्रीमेंटच्या बदल्यात तिसरा पक्ष म्हणून मानराज मोटर्सचे संचालक अशोक बेदमुथा यांना व्यवहारात आणून ३ मार्च २०१७ रोजी डीड ऑफ असाईनमेंट दस्ताऐवज या पाच जणांना बनवून आणले. आपल्या व्यवहारापोटी कटारिया हे परस्पर मानराज मोटर्सला देण्यास तयार असल्याने या करारावर जैन यांनी सही केली. त्यानंतर देखील सहा महिन्याच्या तोंडी मुदतीत रक्कम परत केली नाही. आडगाव, ता.नाशिक, विहिगाव, ता.शरणपूर, जि.ठाणे, सिन्नर व सातपूर येथील जमिनीच्याबाबत करार झालेला होता. यातील काही वाद न्यायालयात आहेत. सिन्नरची जमीन केंद्र सरकारने संपादित केलेली आहे, ही बाब देखील कराराच्यावेळी लपवून ठेवल्याचे जैन यांनी फिर्यादीत नमूद केले आहे.

अशा आशयाच्या फिर्यादीवरुन अशोका बिल्डर्सचे मालक अशोक मोतीलाल कटारिया, स्नेहल सतीश पारख उर्फ स्नेहल मंजीत खत्री, सतीश धोंडूलाल पारख, आशिष अशोक कटारिया व राजेंद्र चिंधूलाल बुरड (सर्व रा.नाशिक) यांच्याविरोधात शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक बळीराम हिरे तपास करीत आहेत.