विश्रामबाग पोलिसांची कामगिरी : वाद मिटविण्यासाठी गेल्यावर झाला होता प्रकार
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : आदल्या दिवशी झालेला वाद मिटविण्यासाठी गेलेल्या तरुणावर व त्याच्या भावावर कोयत्याने वार करुन त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.
दादया ऊर्फ प्रितेश अनिल कानगुडे (वय २३), बल्या ऊर्फ अक्षय चंद्रकांत शेंडकर (वय २८), जित्या ऊर्फ जितेंद्र शेंडकर (वय २८), रोहन मनोहर तांदळे (वय २२, रा. दांडेकर पुल) आणि अनिकेत सचिन दोडके (वय १८, रा. दांडेकर पुल) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी गौरव युवराज खाडे (वय २३, रा. पीएमसी कॉलनी, राजेंद्रनगर) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात (गु. र. नं. १३७/२१) फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी आणि आरोपी हे ओळखीचे असून, त्यांच्यात १ नोव्हेंबर रोजी वाद झाला होता. हा वाद मिटविण्यासाठी गौरव व त्यांचा मोठा भाऊ रोहित हे मध्यरात्री साडेबारा वाजता लोकमान्यनगर येथील ना. सी. फडके चौकाकडून मांगीरबाबा चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर आले होते. तेथे आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या भावाला शिवीगाळ करुन आता याला जिवंत सोडायचे नाही, असे बोलून फिर्यादीच्या डोक्यात कोयता मारला. फिर्यादीने तो हुकवला. त्यामुळे कोयता त्यांच्या पायाच्या नडगीला लागून ते जखमी झाले. त्यांच्या भावाच्या डोक्यात मध्यभागी कोयता मारुन बांबुने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन गंभीर जखमी केले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक कोलंबिकर तपास करीत आहेत.
