विश्रामबाग पोलिसांनी दोघांना केली अटक : पुण्यात भल्या पहाटे घडली घटना
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : पोलीस समजावण्यासाठी गेले असताना आजपर्यंत आमच्या घरी पोलीस आले नव्हते, तुम्ही पोलीस आमच्या घरी कसे आले, आमची तक्रार कोणी केली असे म्हणून पहाटेच्या सुमारास दारु पिऊन भर रस्त्यात आरडाओरडा करुन गोंधळ घालणार्या दोघांना विश्रामबाग पोलिसांनी अटक केली आहे.
मयांक संदीप पारखी (वय ३१, रा. आर.एस.एस. कार्यालयासमोर, शनिवार पेठ) आणि आतिष समीर केकरे (वय २३, रा. वसुंधरा अपार्टमेंट, प्रभात रोड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस नाईक भोसले यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी सांगितले की, शनिवार पेठेत पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास लाऊड स्पिकर लावून काही जण गोंधळ घालत असल्याचे पोलीस नियंत्रण कक्षाला नागरिकांनी कळविले. त्यानुसार पोलीस मार्शल भोसले हे तेथे गेले. तेथे तिघे जण दारु पिऊन मोठ मोठ्या आवाजात आरडाओरडा करीत होते. त्यांना भोसले यांनी समजाविले. तेव्हा त्यांनी अगोदर लाऊड स्पिकर बंद केला. पोलीस काही वेळ तेथेच थांबले असताना मयांक पारखी व आतिष केकरे खाली आले. त्यांनी भोसले यांना आजपर्यंत पोलीस आमच्या घरी आले नव्हते. तरी पोलीस आमच्या घरी कसे काय आले. आमची तक्रार कोणी केली, असे म्हणून मोठमोठ्याने आरडाओरडा केला. फिर्यादी यांच्याबरोबर वाद घालून सार्वजनिक शांततेचा भंग करुन सरकारी कामात अडथळा आणला म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
