पोलीस उपायुक्त सागर पाटील : लष्कर पोलीस स्टेशनमध्ये शांतता कमिटीची बैठक
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : कायदा सुव्यवस्था चांगल्या पद्धतीने हाताळण्याचे प्रशिक्षण पोलिसांना दिले आहे. मात्र, कोणीही कायदा हातात घेऊन या प्रकरणामध्ये कोणी आढळले, तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, पोलीस उपायुक्त सागर पाटील यांनी सांगितले.
अमरावती, नांदेड, कारंजा, मालेगाव येथे घडलेल्या कायदा व सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटी सदस्य, मशिदीचे मौलाना, ट्रस्टी, तसेच लष्कर पोलीस स्टेशन हद्दीतील मान्यवरांची बैठक घेण्यात आली. याप्रसंगी अॅड. प्रशांत यादव, निलेश कणसे, वाहिद कासम बियाबानी, प्रकाश प्रसाद केदारी, संदीप भोसले, मंजूर शेख, प्रवीण गाडे, विकास भांबुरे, हाजी शकिल कुरेशी, सलीम मौला पटेल, अफजल शेख, गुलाम दस्तगीर यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
सहायक पोलीस आयुक्त चंद्रकांत सांगळे म्हणाले की, हिंदू-मुस्लीम वस्तीमध्ये चांगल्या पद्धतीने शांतता राखली जात आहे. सोशल मीडियावर भावना भडकवणारा संदेश आला, तर फॉरवर्ड न करता डिलीट करा, चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नका, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, लष्कर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम म्हणाले की, अफवांवर विश्वास ठेवू नका, कोणत्याही घटनेची शहानिशा केल्याशिवाय विश्वास ठेवू नका, कायदा व शांतता सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करा. एखादी संशयित वस्तू वा व्यक्ती आढळली, तर तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा, असे त्यांनी सांगितले.
