अनैतिक संबंधातून घडला प्रकार : कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : उरुळी देवाची येथील एका शाळेवर सुरक्षा रक्षक म्हणून काम करणारा व त्याच्या मित्रावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. या घटनेत सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाला असून, मित्र गंभीर जखमी झाला आहे. ही घटना सोमवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास घडली. कोंढव्यात खून झाल्यानं प्रचंड खळबळ उडाली आहे.
रवि कचरू नागदिवे (वय 50, रा. देवाची उरुळी) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर बालाजी चव्हाण (रा. वडकी) हा जखमी झाला आहे.
कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, रवी नागदिवे हा उरुळी देवाची येथील एका शाळेवर सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो. तो आणि त्याचा मित्र बालाजी चव्हाण हे दोघेही आज येवलेवाडी परिसरामध्ये आले होते. त्यावेळी त्यांना अज्ञात व्यक्तींकडून बांबू आणि काठ्यांनी जबर मारहाण करण्यात आली. या मारहाणीत नागदिवे याचा जागीच मृत्यू झाला. तर, चव्हाण जखमी झाला असून त्याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ही घटना आज संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली.
आरोपींचा माग काढण्यास पोलिसांची पथके रवाना करण्यात आली असून हा प्रकार अनैतिक संबंधामधून घडल्याचा प्राथमिक अंदाज वरिष्ठ निरीक्षक सरदार पाटील यांनी व्यक्त केला आहे.















