लोणी काळभोर पोलिसांत फिर्याद : स्वप्नीलच्या दहशतीमुळे तक्रार दिली जात नव्हती
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : व्याजाने दिलेल्या ७ लाखांच्या रुपयांच्या व्याजाच्या मोबदल्यात जबरदस्तीने १८ गुंठे जमीन नावावर करुन घेणार्या स्वप्नील कांचन टोळीने आणखी एका शेतकर्याची २० आर जमीन बळकावल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार २० ऑक्टोबर २०१५ पासून आतापर्यंत घडला आहे.
लोणी काळभोर पोलीस ठाण्यात स्वप्नील राजाराम कांचन (रा. उरुळी कांचन) व त्याच्या दोन ते तीन साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी जगदीश जालिंदर महाडिक (वय ३३, रा. खेडेकर मळा, शिंदवणे) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी सांगितले की, स्वप्नील कांचन याने फिर्यादी यांना १५ लाख रुपये ३ टक्के व्याजाने दिले होते. त्यापोटी शिंदवणे गट नं. २७ मधील २० आर क्षेत्र खरेदी खत पलटवून देण्याचे अटीवर खरेदी करुन घेतले होते. त्या पोटी फिर्यादीकडून आतापर्यंत महिन्याला ४५ हजार रुपये असे ६३ महिने एकूण २० लाख ३५ हजार रुपये घेतले.
तसेच काही महिने व्याज न दिल्याने त्या पोटी ३३ लाख रुपये चेक व आरटीजीएस द्वारे घेतले. खोटे शपथपत्र बनवून त्यावर फिर्यादीकडून दमदाटी करुन सही घेतली. फिर्यादी यांनी घेतलेले १५ लाख व व्याज असे एकूण ७६ लाख ३५ हजार रुपये घेतले.
तरीही खरेदी खत पलटवून दिले नाही. त्याबाबत फिर्यादी यांनी विचारले असता त्यांना व घरातील लोकांना जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांच्या जमिनीवर ताबा घेतला. स्वप्नील कांचन याच्या दहशतीमुळे ते इतके दिवस घाबरुन होते. पोलिसांनी एका प्रकरणात स्वप्नील कांचन याला अटक केल्यामुळे आता महाडिक हे तक्रार देण्यासाठी पुढे आले आहेत.
