मोलमजुरी करून गुजरान करणाऱ्यावर बार्शी पोलिसांनी केला अंत्यविधी
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : अकस्मात मृत्यूची नोंद झाल्यानंतर त्यांच्यावर अंत्यविधी कोणी करायचा असा प्रश्न नेहमीच पडतो. मात्र, खाकी वर्दी नेहमी कायदा दाखवत असली, तरी खाकीवर्दीमध्ये माणूस असतो, याचा अनेकांना विसर पडलेला असतो. मात्र, हीच खाकी वर्दी ऐनवेळी पुढे धावून येते, याचा प्रत्यय बार्शी तालुक्यातील वैराग पोलिसांनी केलेल्या कामातून पुढे आला.
विष्णु बलराम कवलदेवी (वय ७०, रा. मूळ सोलापूर, सध्या वैराग, ता. बार्शी, जि. सोलापूर) यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी युवराज हरीचंद्र पासलकर (वय २७, नोकरी, रा. प्राथमिक, आरोग्य केंद्र, वैराग, ता. बार्शी) यांनी वैराग पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी त्यांचा अकस्मात मृत्यू झाल्याची नोंद केली.
पोलिसांनी सांगितले की, मयत व्यक्ती मागिल अनेक वर्षांपासून वैराग परिसरामध्ये मिळेल, तिथे वेटर किंवा मजुरी काम करून गुजरान करीत होता. त्याचा परिसरातील नागरिकांशी परिचय होता. त्यामुळे त्याला येथील नागरिक नावानिशी ओळख होते. परंतु, त्याचा अंत्यविधी कोणी करावा याबाबत संभ्रम निर्माण झाला. त्याचे समाजामध्ये कोणी नातेवाईक आहेत का? याबाबत तपास केला कोणीही नातेवाईक पुढे आले नाहीत. त्यामुळे वैराग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्रा परजने, पोलीस अंमलदार सदाशिव गवळी, सचिन मुंडे, नवनाथ चावरे, दादासाहेब खेंदाड आणि वैरागमधील पत्रकार बांधवांनी नगरपंचायत अधिकारी विलास मस्के,अण्णा जगताप, पप्पू गुंजाळ, बाबा स्वामी, राम जाधव, सामाजिक कार्यकर्ते भैय्या गणाचारी, हरी खेकडे, प्रशांत बेळंबे, बल्लू मणियार, किशोर सोनवणे, युवराज पासलकर, मंडळाचे सर्व कार्यकर्ते तसेच शारुख बागवान मोठ्या संख्येने वैराग लाडूळे वेस येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले. त्यानंतर त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
