अक्कलकोट- गानगापूरचे रोडवरील घटना : गानगापूरचे देवदर्शन घेऊन अहमदनगरला परतताना झाला अपघात
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
सोलापूर : अक्कलकोट-गानगापूर रोडवर कर्नाटक हद्दीत बळुरगी गावाजवळ भरधाव कारचा टायर फुटून भीषण अपघात झाला. या अपघातात पाच जणांचा मृत्यू, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
भरधाव वेगातील कारचा टायर फुटल्याने चालकाचा गाडीवरील ताबा सुटून कार झाडावर आदळली. अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये 4 महिला व चालकाचा समावेश आहे. हा अपघात शुक्रवारी (दि.11) दुपारी तीनच्या सुमारास झाला.
बाबासाहेब सखाराम वीर, कोमल बाबाबासाहेब वीर, राणी बाबासाहेब वीर, अणव हिराबाई, छाया बाबासाहेब वीर यांचा जागीच मृत्यू झाला. तर साहिल बाबासाहेब वीर, चैत्राली दिनकर सुर्यवंशी गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी अफझलपूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अपघातात मृत्यू झालेले आणि जखमी हे सर्व अहमदनगर जिल्ह्यातील आहेत. हे सर्वजण गानगापूरला दर्शनासाठी गेले होते. गानगापूरहून परत अहमदनगरला जात असताना हा भीषण अपघात झाला. शिकाऊ चिन्ह असलेलं ‘L’ असं देखील गाडीच्या मागच्या काचेवर दिसत आहे. डॅटसन गो प्लस या गाडीतून हे सर्व प्रवास करत होते. पुढील तपास अफझलपूर पोलीस करीत आहेत.
