वर्धमान प्रतिष्ठान मध्ये मौलिक मार्गदर्शन
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : स्वतःला कधीच कमी लेखू नका. स्वतःची कधीच परीक्षा घेऊ नका. आपण जसे आहोत तसे ठीक आहोत. स्वतःला स्वीकारा, असे विचार आचार्य चंदनाजी यांनी आपल्या प्रवचनात आज मांडले. वर्धमान प्रतिष्ठान आणि शिवाजीनगर जैन स्थानकाच्या वतीने आचार्य चंदनाजी यांचे चातुर्मास प्रवचन सुरू आहे. त्यावेळी त्या बोलत होत्या.
आपल्या प्रवचनात चातुर्मासाचे महत्त्व सांगत असताना आचार्य चंदनाजी यांनी पावसाळा ऋतूचे प्रकृतीतील महत्त्व स्पष्ट केले. तिन्ही ऋतूंमध्ये पावसाळा हा अधिक महत्त्वपूर्ण असतो. पावसाळ्या शिवाय वर्ष पूर्ण होऊ शकत नाही.
वर्षा या नावावरूनच ‘वर्ष’ हे नाव तयार झाले असल्याचे त्यांनी सांगितले. ज्या प्रकारे वातावरणातील शुष्कता आणि उष्णता कमी करण्याचे काम हे पावसाळा ऋतू करत असतो त्याच प्रमाणे आपल्या मनातील नकारात्मकता दूर करण्यासाठी प्रभुचे स्मरण करणे आवश्यक असते आणि देवाला वेळ देता यावा यासाठीच चातुर्मास असतो.
ज्याप्रमाणे बाहेरील एक जीवन आहे त्याचप्रमाणे आपल्या शरीरात देखील एक जीवन असते. त्याला आपण शरीर असे म्हणतो. शरीर म्हणजे आपला मित्र आहे. शरीर म्हणजे चांगले कर्म करण्याचे एक माध्यम आहे. शरीराचा कधीही तिरस्कार करू नका, त्याला कधी त्रास देऊ नका आणि शरीराचा कधीही गुलामही बनू नका.
जर आपण शरीराचे गुलाम झालो तर आपल शरीर अस्वस्थ होईल असेही त्या म्हणाल्या. ज्याप्रमाणे कपड्यावरील एक छोटासा डाग कपड्याला खराब करू शकतो त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यातील एक डाग आपल आयुष्य हे खराब करू शकतो आणि आपल्या आयुष्याला साफ करण्यासाठी म्हणून चातुर्मास महत्त्वाचा असतो असे प्रतिपादन त्यांनी केले.
प्रवचनात पुढे साध्वी शिलापीजी यांनी प्रत्येक बाळ हे एक सदभावना घेऊन जन्माला येते, पण जीवन जगत असताना अपेक्षांच ओझ समोर उभ राहत आणि त्यामुळे हव तस आयुष्य जगता येत नाही. जीवन म्हणजे एक सुवर्णसंधी आहे आणि शब्दांमुळे जीवन अजून सुंदर बनत जाते.
या विषयीच भगवान महावीरांनी अनेक गोष्टी सांगितल्या आणि ताईमांनी त्याचा अतिशय सुंदर पद्धतीने अनुवाद केला आहे. देवाने आपल्याला आयुष्य दिल पण ते कस जगाव हे आपल्याला माहिती नसल्यामुळे जीवन महोत्सव म्हणून साजरा करता येत नाही.
ज्याच्या आयुष्यातून तक्रारी संपल्या तो खऱ्या अर्थाने जीवन जगला आणि तोच खऱ्या अर्थाने धार्मिक झाला अस म्हणता येईल. फक्त चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करण हा आपला धर्म आहे. इतिहास वाचल्यावर आपल्या लक्षात येत की देवांचे आयुष्य आणि आपल आयुष्य एक सारखंच आहे.
म्हणूनच भगवान महावीर म्हणतात की, “अहिंसा परमो धर्म”. कारण त्या काळातही हिंसा होतच असेल म्हणून भगवानांनी अहिंसेला आपला धर्म केला. जीवन कस जगाव हे आपल्या हातात असत. म्हणून जितक आनंदी राहून जीवन जगता येईल तितक जगायच असही त्या म्हणाल्या. जर आपण आज आनंदी राहू शकलो तर उद्याही आपल्या वाट्याला आनंदच येईल असे त्या म्हणाल्या.
आचार्य चंदनाजींना पंढरपूर वारीची आठवण
मला पंढरपूरची वारी खूप आवडते. लहान असताना मी दरवर्षी त्या वारीत सहभागी होत असे. त्या वारी मध्ये सगळ्यांचा मानवता हाच एक धर्म असतो. आपण फक्त देवाच्या दिशेने चालत राहायच, आपल्यापर्यंत आपल्याला हवी ती सेवा अगदी बरोबर पोहोचते. कारण देवाला आपली काळजी आहे, अशीही भावना त्यांनी व्यक्त केली.
