महाराष्ट्र न्युज नेटवर्क
मुंबई : छत्रपती संभाजीनगरच्या ऑरिक औद्योगिक सिटीमध्ये मोटार गाड्यांच्या निर्मितीचा प्रकल्प उभारण्याबरोबरच टोयोटा किर्लोस्कर मोटर्स ही विख्यात कंपनी याच ठिकाणी कौशल्य विकास आधारित तांत्रिक संस्थादेखील उभारणार आहे. त्यातून तरुण-तरुणींना या आणि अन्य उद्योगांमध्ये रोजगार मिळविण्यासाठीचे प्रशिक्षण दिले जाईल. टोयोटा कंपनी आपल्या सीएसआर फंडातून या संस्थेची उभारणी करणार आहे.
छत्रपती संभाजीनगर येथे याप्रकल्पातून इलेक्ट्रिक आणि हायब्रीड कारचे उत्पादन होणार आहे. सुमारे ८ हजार थेट आणि अप्रत्यक्ष ८ हजार अशी १६ हजार रोजगारनिर्मिती होणार आहे, अशी माहिती कार्यक्रमात देण्यात आली. या प्रकल्पातील गुंतवणूक २० हजार कोटी रुपयांची असेल.
यासाठी कंपनी आणि राज्य सरकार यांच्यात बुधवारी सह्याद्री अतिथीगृहावर परस्पर सामंजस्य करार झाला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री उदय सामंत आदींसह कंपनी अधिकारी उपस्थित होते.
करारावर स्वाक्षरी करतेवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, उद्योगमंत्री उदय सामंत, गृहनिर्माणमंत्री अतुल सावे, किर्लोस्कर मोटर्सच्या उपाध्यक्ष मानसी टाटा, गीतांजली किर्लोस्कर, टोयोटा किलॉस्करचे व्यवस्थापकीय संचालक मसाकानु योशीमुरा उपस्थित होते.
या प्रकल्पाबाबत कमालीची गुप्तता बाळगण्यात आली होती. सह्याद्री अतिथीगृहावरील या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार सभागृहात आले. त्यावेळी त्यांनी केवळ एक तास आधी या कार्यक्रमाचे आमंत्रण आपल्याला दिल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.
एवढा मोठा प्रकल्प आपल्याकडे येत असताना मला केवळ तासभर आधी कल्पना कशी काय दिली असा प्रश्न त्यांनी केला. छत्रपती संभाजीनगर येथे याप्रकल्पातून इलेक्ट्रिक आणि हायब्रीड कारचे उत्पादन होणार आहे.
सुमारे ८ हजार थेट आणि अप्रत्यक्ष ८ हजार अशी १६ हजार रोजगारनिर्मिती होणार आहे, अशी माहिती कार्यक्रमात देण्यात आली. प्रकल्पातून वर्षाला ४ लाख कारची निर्मिती होणे अपेक्षित आहे. टोयोटाच्या या प्रकल्पामुळे भारताच्या ई-कारनिर्मिती उद्योगात क्रांती येईल.
राज्य विदेशी गुंतवणुकीत अग्रेसर आहेच; दोन वर्षात दावोस येथे झालेल्या ६० दशलक्ष डॉलर्सच्या करारांची ८० टक्के अंमलबजावणी झाली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.
आपल्या भाषणाची सुरुवात मुख्यमंत्र्यांनी जपानी भाषेत नमस्कार म्हणजे ‘कोनीचिवा’ असे संबोधत केली.
आभारदेखील ‘एरिंगेटो गोझामासू’ अशा शब्दांत मानले. कराराचे वर्णन ‘ऐतिहासिक’ या शब्दांत करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, टोयोटा कंपनी महाराष्ट्रात आल्याने आजवरची अपूर्णता संपली आहे.
