विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल : लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : एका बाजूला नोकर्या मिळत नाही. स्वत: काही व्यवसाय करण्याचा प्रयत्न केला तर गल्लीबोळातील खंडणीखोरांचा त्रास होत असल्याचे वारंवार दिसून येत असून या खंडणीखोरांवर कोणाच वचक नसल्याचे दिसून येत आहे. पोह्याची गाडी लावणार्या एका तरुणाने खंडणी देण्यास नकार दिल्याने टोळक्याने घरातून चक्क अपहरण केले. त्याला लाथा बुक्क्यांनी मारहाण करुन तू जर पैसे दिले नाही तर तुला पुन्हा घरातून उचलून आणू अशी धमकी दिली.
याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी अभिजित दत्ता पाखरे (वय २४, रा. आकाश पार्क, धानोरी) आणि श्रीशल्य सोमनाथ म्हस्के (वय २०, रा. प्रजासत्ताक कॉलनी, धानोरी) या दोघांना अटक केली आहे. त्याचे साथीदार हर्षल गुंजाळ, शेखर लोंढे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी निलेश तुलशीराम अहिरवार (वय २२, रा. धानोरी) यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार शनिवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडला होता.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी व त्याचा भाऊ पुष्पेंद्र अहिरवार हे घरी होते. त्याचवेळी त्यांच्या ओळखीचे चौघे जण घरात शिरले. ते फिर्यादी यांच्याजवळ येऊन तुला जर पोह्याची गाडी लावायची असेल तर आम्हाला प्रत्येक महिन्याला ६ हजार रुपये खंडणी द्यावी लागेल, असे म्हणाला.
त्यावर फिर्यादी यांनी त्यांना पैसे देण्यास नकार दिला. तेव्हा त्यांनी फिर्यादी यांना घरातून जबरदस्तीने उचलून बाहेर आणले. अभिजित पाखरे याच्या चारचाकी गाडीमध्ये घातले. कारमधून त्यांना हडपसर येथील निर्जन स्थळी नेले. तेथे चौघांनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. आम्हाला पैसे दिले तरच तुला सोडू जर तू पैसे नाही दिले तर तुला पुन्हा घरातून उचलून आणु अशी धमकी दिली. त्यानंतर ते निघून गेले. विश्रांतवाडी पोलिसांनी दोघांना अटक केली असून सहायक पोलीस निरीक्षक निकम तपास करीत आहेत.
