मित्रानेच केला घात : पुण्यात आर्थिक संबंधातून समीरवर झाला बेछुट गोळीबार!
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवार रोजी दुपारी पावणे बाराच्या सुमारास एका व्यक्तीचा सहा गोळ्या झाडून खून करण्यात आला. या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन पोलिसांनी एकाला अटक केली आहे. तर त्याचे इतर दोन साथिदार फरार झाले आहे. आर्थिक देवाण-घेवाणीतून हा खून झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच मयताची कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसून केवळ आर्थिक व्यवहारातून हा खून झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
समीर हुसेन मनूर (वय 28 वर्षे, राहणार फालेनगर, भारती विद्यापीठ) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. मेहबूब सैफन बनोरगी असे ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तो समीरचा मित्र होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत समीर मनूर हे बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांचे जुने मित्र मेहबूब सैफन बनोरगी यांच्यासोबत झालेल्या पैशांच्या देवाण-घेवाणीच्या व्यवहारातून बनोरगी आणि त्याच्या साथिदारांनी शेख यांच्यावर गोळीबार करुन त्यांचा खून केला आहे. मयत आणि आरोपी यांच्यामध्ये मागील सात महिन्यापासून वाद होता, असेही पोलिसांनी सांगितले. या गुन्ह्यातील दोन आरोपी हे जनता वसाहतमधील आहेत. त्यांच्यात पैशांच्या देवाण-घेवाणीतून 6-7 महिन्यांपूर्वी वाद झाला होता. मात्र, त्यावेळी त्यांनी त्यांच्यातील हा वाद मिटवून घेतला होता.
असा केला खून..
आरोपींनी मयत समीर याचा त्याच्या घरापासून पाठलाग केला होता.
घरातून बुलेट वर बाहेर पडलेला समीर हा चहा पिण्यासाठी चंद्रभागा चौकात आला होता. समीर रोज ज्या ठिकाणी चहा पेयला येत होता ते ठिकाण आरोपींनी निवडले होते. समीर हा चहा पित असताना आरोपींनी पाठिमागून त्याच्यावर बेछूटपणे तब्बल सहा गोळ्या झाडल्या. डोक्यावर झालेल्या या गोळीबारात समीरचा जागीच मृत्यू झाला.
