हिंजवडी पोलिसांत गुन्हा : मुंबई-बंगळूरू महामार्गावर चांदणी चौकात भीषण अपघात
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : मुंबई-बंगळूरू महामार्गावर भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. भरधाव वाहनाने रुग्णवाहिकेला पाठीमागून जोरात धडक दिली आहे. या झालेल्या अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात मुंबई-बेंगळुरू महामार्गावर चांदणी चौक येथे शुक्रवारी रोजी झाला आहे.
रुग्णवाहिका चालक महेश विश्वनाथ सरवडे (वय 44, रा. कोपर खैरणे, नवी मुंबई) आणि सीताबाई हरी चव्हाण (वय 54, रा. तळोजा), अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. मनोहर हरी चव्हाण (वय 26), राजा हरी चव्हाण (वय 35), शिवाजी मारुती खडतरे (वय 30) हे तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. गोपाळ भीमला चव्हाण (वय 45, रा. तळोजा एमआयडीसी, पनवेल) यांनी या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यानंतर आयशर गाडी चालकाच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, चांदणी चौकात एक रुग्णवाहिका टायर बदलण्यासाठी थांबली होती. रुग्णवाहिकेचा चालक आणि क्लिनर टायर बदलत होते. त्या दरम्यान भरधाव वेगात आलेल्या आयशर गाडीने रुग्णवाहिकेला पाठीमागून जोरात धडक दिली. या अपघातामध्ये रुग्णवाहिकेचा चालक आणि एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर रुग्णवाहिकेचा क्लिनर आणि अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत. अपघात झाल्यानंतर आयशर गाडी चालक पळून गेला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
