येरवडा पोलिसांची कारवाई : भावाच्या आत्महत्येचा बदला घेण्यासाठी केला प्रकार
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : भावाने आत्महत्या केल्याच्या रागातून त्याच्या प्रेयसीच्या मुलाचे जीवे ठार मारण्याच्या हेतूने अपहरण करणार्या चौघांना येरवडा पोलिसांनी अटक केली आहे. या तरुणाचे कल्याणीनगर येथून अपहरण करुन पेरणे फाटा येथे नेण्यात आले होते.
विजय राम गेचंद (वय २५), सुरज गंगाराम मौर्य (वय २८), अजय राघोबा हावळे (वय २८), विकास आनंद भंडारी (वय ३२) आणि जमीर करीम शेख (वय १९, रा. राजीव गांधीनगर, येरवडा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याप्रकरणी एका महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी सांगितले की, महिलेचे सनी गेचंद याच्याशी संबंध होते. तो एके दिवशी दारु पिऊन या महिलेच्या घरी आला होता. तेव्हा तिने त्याला घरात न घेता घरी जाण्यास सांगितले. तेव्हा त्याने टेरेसवर जाऊन आत्महत्या केली होती. या घटनेचा त्याचा भाऊ विजय गेचंद याला राग होता.
या महिलेचा मुलगा हा कल्याणीनगर येथील डी मार्ट येथे काम करतो. शुक्रवारी रात्री तो घरी जाण्यासाठी निघाला असताना हत्याराचा धाक दाखवून त्याचे कारमधून अपहरण करण्यात आले. त्याने आपले अपहरण झाल्याचे आईला कळविले. त्यांनी तातडीने येरवडा पोलिसांकडे धाव घेतली. डी मार्टसमोरील सीसीटीव्ही तपासले असता, विजय गेचंद हा तेथे उभा असलेला दिसून आला. येरवडा पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करुन माहिती मिळविली. त्यात अपहरणकर्ते हे पेरणे फाटा येथे असल्याची माहिती मिळाली. त्यावरुन पोलो कारचा शोध घेऊन पोलिसांनी अपहरण झालेल्या तरुणाची सुटका करुन चौघांना अटक केली आहे.
पोलीस उपायुक्त रोहिदास पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस शेख, निरीक्षक (गुन्हे) विजयसिंह चौहान यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र आळेकर, पोलीस उपनिरीक्षक अंकुश डोंबाळे, पोलीस उपनिरीक्षक विशाल पाटील, पोलीस हवालदार गणपत थिकोळे, दत्ता शिंदे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
