आर्थिक गुन्हे शाखेकडे फिर्याद : पार्श्वगायक अभिजित भट्टाचार्य यांची फसवणूक प्रकरण
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : पार्श्वगायक अभिजीत भट्टाचार्य यांना जमीन शिल्लक नसताना जादा जमिनीची विक्री करुन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
गणेश केंजळे याने भट्टाचार्य यांची फसवणूक केली आहे. यानंतर गणेश केंजळे आणि महेश केंजळे (दोघे. रा. शिवतीर्थनगर, पौड रोड, कोथरुड) यांनी लघु उद्योजक मिलिंद महाजन यांचीदेखील फसवणूक केली आहे. याप्रकरणी महाजन यांनी पुणे ग्रामीण पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे फिर्याद दिल्यानंतर दोघांना अटक झाली होती.
दरम्यान, गणेश केंजळे याच्यावर गुन्हा दाखल केल्याचे समजताच अभिजित भट्टाचार्य यांनी पौड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पौड पोलिसांनी गणेश केंजळे याच्याविरोधात आणखी एक फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भट्टाचार्य यांचे भुकुम (Bhukum) येथील परांजपे लेक व्ह्यू इस्टेटमध्ये 20 गुंठे क्षेत्र आहे. त्या ठिकाणी त्यांनी बांधकाम केले आहे. 2010 मध्ये ते आपल्या कुटुंबासमेत राहायला आले होते. त्यावेळी त्यांची गणेश केंजळे याने भेट घेतली.
गणेश केंजळे याने तुमच्या बंगल्याला लागूनच माझी जमीन असून तुम्हाला पाहिजे असेल तर मी विकण्यास तयार असल्याचे अभिजित भट्टाचार्य यांना सांगितले. बंगल्याला लागून जमीन असल्याने भट्टाचार्य यांनी 36 आर जमीन 38 लाख 80 हजार रुपयांना विकत घेतली. त्यानंतर भट्टाचार्य यांनी जमिनीचे सपाटीकरण करुन त्याठिकाणी एक तलाव बांधला. काही दिवसांनी त्यांनी ऑनलाइन 7/12 उतारा पाहिला असता त्यांच्या नावासमोर केवळ 4.66 आर क्षेत्र असल्याचे दिसले.
भट्टाचार्य यांना ज्या गटातील जमीन गणेश याने विकली होती त्या गटातील अतिरिक्त जमीन भट्टाचार्य यांच्या नावावर झाली नव्हती. मुळशी तहसीलदार (Mulshi Tehsildar) यांच्या निकालावरुन भट्टाचार्य यांच्या नावावर 4.66 क्षेत्र शिल्लक ठेवून उरलेले 32 आर क्षेत्र अतिरिक्त ठरवले आहे. त्यामुळे गणेश केंजळे याने 36 आरची विक्री करुन 38 लाख 80 हजार रुपये घेतले. प्रत्यक्षात त्याने 32 आर क्षेत्राची 33 लाख 77 हजार 755 रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
