शिक्षण विभागात खळबळ : सायबर पोलिसांच्या तपासामध्ये माहिती उघड
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : मागील काही दिवसांपासून शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळ्यात नवीन माहिती समोर आल्यामुळे खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2021 म्हणजेच टीईटीसाठी अपात्र ठरलेल्या 7 हजार 800 परीक्षार्थींना पैसे घेऊन उत्तीर्ण करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुणे सायबर पोलिसांच्या तपासामध्ये ही बाब समोर आली आहे.
दरम्यान, 2018 आणि 2019 च्या टीईटी परीक्षेत मोठ्या प्रमाणात हा गैरव्यवहार झाला आहे. राज्य परीक्षा परिषदेकडून आलेला मूळ निकाल आणि प्रत्यक्ष जाहीर केलेला निकाल याची पडताळणी सायबर पोलिसांकडून करण्यात आली आहे. टीईटी परीक्षेत घोटाळेबाजांनी उमेदवारांकडून 50 ते 60 हजार रुपये घेऊन त्यांना पात्र ठरवल्याचं उघडकीस आलं आहे.
तसेच, 2019-20 च्या परीक्षेत एकूण 16 हजार 592 जणांना पात्र असल्याचा निकाल लावण्यात आलेला होता. मात्र पोलिसांनी प्रत्यक्ष निकाल पडताळून पाहिल्यानंतर तब्बल 7 हजार 800 परीक्षार्थी हे अपात्र असल्याचं समोर आलं. असं असतानाही या सर्वांना पात्र ठरवण्यात आलं आहे. पुणे सायबर पोलिसांच्या तपासानंतर ही बाब लक्षात येताच शिक्षण विभागात मोठी खळबळ उडाली आहे.
