नागरिकांमध्ये तीव्र संताप : लोणी काळभोर पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पथकाकडून तीन चौकशी
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : उरूळी कांचन (ता. हवेली, जि. पुणे) पिंपरी सांडस येथे झालेल्या खुनाच्या चौकशीत बरे वाईट होईल, या भीतीने युवकाने विष पिऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
पिंपरी सांडस येथे झालेल्या खून प्रकरणात भवरापूर येथील एका युवकाची लोणी काळभोर आणि पुणे गुन्हे शाखेच्या पथकाकडून या युवकाची सलग तीन दिवस चौकशी करण्यात आली. आरोप सिद्ध न होताच पोलिसांच्या भीतीपोटी एका तरुणाचा जीव गेल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे.
बाबासाहेब बबन काटे (वय-32 रा. भवरापूर) असे विष पिऊन आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे. पिंपरी सांडस येथे भीमा नदीत संतोष गायकवाड याचे शिर व हातपाय छाटलेला मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी तसेच पुणे शहराच्या गुन्हे शाखेच्या पथकाने तपासासाठी बबासाहेब काटे यांची सलग तीन दिवस चौकशी केली. काटे याने आत्महत्या करण्यापूर्वी लिहून ठेवलेली चिठ्ठी सापडली आहे. पोलिसांच्या चौकशीत बरे वाईट होईल या भीतीने आत्महत्या केल्याचे सापडलेल्या चिठ्ठीत नमूद केले आहे. त्यामुळे काटे याने पोलिसांच्या भीतीने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे.
चिठ्ठीत काय म्हटले?
सतत तीन दिवस चौकशी केल्यामुळे दु:ख झाले आहे. तसेच हा खून कोणी व का केला याची मला माहिती नाही. पोलीस माझी चौकशी करीत असल्याने माझ्या कामाच्या ठिकाणी खाडे होत आहे. माझ्याकडे पैसे नाहीत व मी मेल्यावर माझ्या मुलीचे व बायकोचे कसे होणार? माझ्यावर कोणताही दबाव नाही. घरच्यांना कोणीही त्रास देऊ नका. मला जेवढी माहिती होती तेवढी मी पोलिसांना दिली आहे. मला मरायचे नव्हते, परंतु माझे नाव आले त्यामुळे मागील तीन दिवसांपासून मी जेवलो नाही किंवा झोपलो ही नाही. मला माझ्या मुलीला शिकवायचे होते. परंतु मला खूप टेंशन आल्यामुळे मी औषध घेत आहे. पोलिसांना जबाबदार ठरवत नसल्याचेही चिठ्ठीत नमूद केले आहे.
