दत्तवाडी पोलिसांत फिर्याद : आई-वडिल जादुटोणा करत असल्याच्या संशयाने विवाहितेचा छळ
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : आई-वडिल जादुटोणा करतात, त्यामुळे मला यश येत नाही, असा संशय घेऊन विवाहितेला मारहाण करुन छळ केला जात होता. या छळाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केली. दत्तवाडी पोलिसांनी पतीला अटक केली आहे.
अतुल गोरख साळवे (रा. जनता वसाहत, पर्वती) असे अटक केलेल्या पतीचे नाव आहे. सुनिता साळवे आणि आकाश साळवे (रा. जनता वसाहत, पर्वती) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कविता अतुल साळवे असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी प्रकाश त्रिंबक तायडे (वय ६०, रा. चांगेफळ, बुलढाणा) यांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी यांची मुलगी कविता हिचा विवाह अतुल गोरख साळवे यांच्याशी झाला होता. लग्न झाल्यापासून तिचा सासरी छळ होत होता. तुझ्यासोबत लग्न झाल्यामुळे माझे वाटोळे झाले. तुला घरातील काम करता येत नाही. तुझे वडील जादु टोणा करतात. त्यामुळे मला यश येत नाही, असे बोलून तो तिच्याशी वाद घालून मारहाण करीत असे, या शारिरीक व मानसिक छळाला कंटाळून कविता हिने २ फेब्रुवारी रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्यावर अंत्यसंस्कार व अन्य विधी केल्यानंतर तिच्या वडिलांनी फिर्याद दिली असून, पोलीस उपनिरीक्षक खरात अधिक तपास करीत आहेत.
