महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : कॉलेजमधून घरी जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दुचाकीला पाठिमागून भरधाव वाहनाची जोरदार धडक बसली. या अपघातात दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. हा अपघात चाकण-शिक्रापूर राज्यमार्गावरील कडाचीवाडी हद्दीत सायंकाळी तीनच्या सुमारास झाला. या घटनेमुळे साबळेवाडी व बहुळ परिसरात शोककळा पसरली आहे.
तन्मय पंकज हरगुडे (वय-18 रा. साबळेवाडी, ता. खेड) व ओंकार कैलास साबळे (वय-18 रा. बहुळ ता. खेड) असे अपघातात मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहे.
पोलिसांनी सांगितले की, तन्मय व ओंकार कॉलेजमधून आपल्या दुचाकीने घरी जात होते. कडाचीवाडी हद्दीत पाठिमागून भरधाव वेगात येणाऱ्या वाहनाची धडक त्यांच्या दुचाकीला बसली. या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी दोघांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु तन्मयचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगितले.
तन्मय याच्या पाठीमागे आजी-आजोबा, आई-वडील, भाऊ, चुलते असा परिवार आहे. बहुळ विविध कार्यकारी विकास सोसायटीचे माजी चेअरमन पंकजबाप्पू हरगुडे यांचे ते चिरंजीव होते. तर ओकांर हा सामाजिक कार्यकर्ते कैलास बाजीराव साबळे यांचा मुलगा होता.
