कॉपीमुक्त परीक्षेसाठी विशेष अभियान : उपविभागीय पोलिस अधिकारी जालिंदर नालकुल यांची माहिती
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
बार्शी : येथील महाराष्ट्र विद्यालय बार्शी, श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी, श्रीमान भाऊसाहेब झाडबुके बार्शी, सौ. माई सोपल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बार्शी, स्वामी समर्थ माध्यमिक विद्यालय, बार्शी लातूर रोड या केंद्रावर बारावीची परीक्षा ४ मार्चपासून सुरू होत आहे. परीक्षा केंद्र आणि १०० मीटर परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी विशेष पोलीस बंदोबस्त ठेवला असल्याची माहिती बार्शीचे उपविभागीय पोलिस अधिकारी जालींदर नालकुल यांनी दिली.
उपविभागीय पोलिस अधिकारी जालिंदर नालकुल यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांनी सांगितले की, मार्च-एप्रिल २०२२ मध्ये बारावी-दहावीच्या परीक्षा केंद्रावर गैरप्रकार रोखण्यासाठी कॉपीमुक्त अभियान सुरू राहणार आहे. बारावीची परीक्षा ४ ते ३० मार्च २०२२ दरम्यान आणि दहावीची १५ मार्च ते ४ एप्रिल २०२२ दरम्यान आयोजित केली आहे. परीक्षा केंद्रावर गैरप्रकार होऊ नयेत, यासाठी पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी (माध्यमिक, प्राथमिक, निरंतर शिक्षण) यांची दक्षता समिती स्थापन केली आहे. परीक्षा केंद्रावर गैरप्रकार होऊ नये, यासाठी समितीच्या सदस्यांमार्फत परीक्षा सुरू असताना परीक्षा केंद्रांना, विशेषतः उपद्रवी केंद्रांना भेटी देण्याची व्यवस्था करावी. तसेच परीक्षेमध्ये गैरप्रकार होऊ नयेत, यासाठी मंडळाकडून भरारी पथके, बैठी पथके, परीक्षा केंद्र परिसराचे बाह्यचित्रीकरण या उपाययोजना केल्या आहेत.
परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरात पोलीस अधिनियम ३७(१)(३) कलमांचा वापर करण्यात येत आहे. सदर कलम लागू केल्यानंतर बाह्य उपद्रव कर्म होत नसल्यास अशा केंद्रांवर १४४ कलम लागू करण्यात येईल तसेच परीक्षा केंद्राच्या परिसरातील झेरॉक्स केंद्र बंद ठेवून, बाह्य उपद्रव होणार नाहीत, यासाठी पुरेसा बंदोबस्त करण्याच्या सूचना सोलापूरच्या उपनिवासी जिल्हाधिकारी यांनी दिल्याची माहिती बार्शी शहराचे पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांनी दिली. तसेच बार्शीतील परीक्षा केंद्रावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येत आहे.
