विश्रांतवाडी पोलिसांत फिर्याद : मोटारसायकलमधील पेट्रोल संपल्याने घरी सोडण्यास सांगितल्याने झाला वाद
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : पहाटेच्या सुमारास घरी जात असताना मोटारसायकलमधील पेट्रोल संपल्याने त्याने रिक्षाचालकाला घरी सोडण्यास सांगितले. मात्र, त्याने नकार दिल्याने झालेल्या वादातून रिक्षाचालक व त्याच्या तीन साथीदारांनी दोघा तरुणांवर चाकूने वार करुन जबर जखमी केले.
याप्रकरणी अमित अनिल गिल (वय २५, रा. टिंगरेनगर, विश्रांतवाडी) यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी रिक्षाचालक व त्याच्या तीन साथीदारांवर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित गिल व त्याचा मित्र सुशांत अनिल मोरे हे रविवारी पहाटे सव्वा चार वाजता मोटारसायकलवरुन घरी जात होते. त्यावेळी वाटेत त्यांच्या मोटारसायकलमधील पेट्रोल संपल्याने टिंगरेनगर येथील लेन नंबर ३ येथे गाडी बंद पडली. तेथे असलेल्या रिक्षाचालकाला त्यांनी घरी सोडण्यासाठी विचारणा केली. त्याने येण्यास नकार दिला. त्यावरुन त्यांच्यात वादावादी झाली. तेव्हा रिक्षाचालकाने शिवीगाळ केली. रिक्षात बसलेल्या तिघांना आवाज देऊन बोलावले. “याला लय मस्ती आहे. याला आज सोडायचे नाही,” असे रिक्षाचालक म्हणाला. त्यावर रिक्षामधून तिघे जण उतरले. त्यांच्यातील एकाने चाकू काढून “याची आज विकेट टाकतो,” असे बोलून त्याने अमित याच्या पोटात चाकूने वार केला. त्याला सोडविण्यासाठी सुशांत मोरे हा मध्ये आला असताना त्यालाही पोटात व पाठीत चाकूने वार करुन गंभीर जखमी केले. पोलीस उपनिरीक्षक सातपुते अधिक तपास करीत आहेत.
