रामनाथ कोविंद, माजी राष्ट्रपती.
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे : सामाजिक काम करताना समाजाचे आपण काही देणे लागतो, या भावनेतून ते काम केल्यास ते अधिक जोमाने वाढते. प्रत्येकाने आपल्या सामाजिक उत्तरदायीत्वाचे भान ठेवणे आवश्यक आहे, असे मत भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केले.
जनसेवा फौंडेशनतर्फे उभारण्यात आलेल्या भव्य अशा ‘श्री. बहारी मल्होत्रा रेसिडेन्शियल अँडव्होकेशनल ट्रेनिंग होम फॉर गर्ल्स’चे उद्घाटन आज भारताचे माजीराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर बजाज फिनसर्व्हच्या सुकाणू समितीच्या अध्यक्ष शेफाली बजाज, अश्विनी मल्होत्रा, जनसेवा फौंडेशनचे आधारस्तंभ ज्येष्ठ उद्योजक नितीनभाई देसाई, राजेश शहा, जनसेवा फौंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. विनोदशहा, मीना शहा आदी उपस्थितहोते.
यावेळी बोलताना भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले की, वैश्विक स्तरावर निसर्गाचा एक नियम असून तुम्ही जे काही चांगले-वाईट कृत्य कराल, त्या कृत्यांची चांगली-वाईट फळे या ना त्या मार्गाने तुमच्यापर्यंत पोहोचत असतात. यशाच्या शिखरावर पोहोचल्यानंतर मागे वळून पाहताना आपण हजारोंना मागे सोडून येथे आलो आहोत, याची जाणीव ठेवून ते देखील आपल्यापर्यंत कसे पोहोचतील, त्यांचा जीवनस्तर देखील कसा उंचावेल हे आपण पाहिले पाहिजे. समाजातून आपण मोठे होत असताना ते मोठेपण आपल्या एकट्याच्या बलबुत्यावर प्राप्त होत आहे, असे नसून आपल्या प्रगतीत समाजातील छोट्या-मोठ्या अशा सर्वच घटकांचे योगदान आणि सहभाग असतो. जनसेवा फौंडेशनने हजारो मुला-मुलींच्या जीवनात प्रकाश पेरण्याचे काम केले आहे. समाजातील अशाच सक्षम व्यक्ती आणि संस्थांनी पुढाकार घेऊन आजही जी हजारो मुले वंंचित, बेघर आणि मुख्य प्रवाहापासून दूर आहेत, त्यांच्या सर्वांगीण उत्थानासाठी पुढे येण्याची गरज आहे.
बजाज फिनसर्व्हच्या सुकाणू समितीच्या अध्यक्ष शेफाली बजाज यांच्यावतीने कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबीलीटी अंतर्गत चालणाऱ्या उपक्रमांची माहिती खुरेशी राणी यांंनी दिली. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जनसेवा फौंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. विनोद शहा यांनी ‘श्री. बहारी मल्होत्रा रेसिडेन्शियल अँड व्होकेशनल ट्रेनिंग होम फॉर गर्ल्स’विषयी सविस्तर माहिती दिली. सूत्रसंचालन कीर्ती देशपांडे यांनी केले.
