महाराष्ट्र न्युज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ
बार्शी : बार्शीतून पुणे आणि मुंबईला जाण्यासाठी प्रवाशांची नेहमीच वर्दळ असते. त्यात, बार्शीतून रेल्वे प्रवास सहज-सोपा असल्याने बार्शीकर रेल्वे प्रवासालाही प्राधान्य देत आहेत. काही दिवसांपूर्वी नांदेड-पनवेल गाडीला थांबा देण्याची आग्रही मागणी पूर्ण झाली. त्यानुसार, या गाडीला बार्शीतून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येते.
बार्शीतील रेल्वे प्रशासनाने यासंदर्भात आकडेवारी देताना, गेल्या तीन महिन्यात बार्शीतून चढलले आणि उतरलेल्या प्रवाशांची संख्या सांगितली आहे.
ही संख्या समाधानकारक असल्याचं रेल्वेनं म्हटलंय. १७६१३ पनवेल – नांदेड एक्सप्रेसला पहिल्या तीन महिन्यांत बार्शीतून सरासरी १५.२४ प्रवासी प्रती दिवस मिळाले आहेत. त्यामध्ये, (१६४ बसणारे+१२०८ उतरणारे) आरक्षित प्रवासी आहेत. १७६१४ नांदेड-पनवेल एक्सप्रेसला पहिल्या तीन महिन्यांत बार्शीतून सरासरी ३.३२ प्रवासी प्रती दिवस मिळाले आहेत. त्यामध्ये, (२२४ बसणारे+७५ उतरणारे) आरक्षित प्रवासी संख्या आहे. या गाडीसाठी रेल्वे प्रशासानाला अपेक्षित किमान सरासरी ३५-४० प्रवासी प्रती दिवस असून, सदर रेल्वेगाडीला बार्शीतून चांगला प्रतिसाद मिळाल्यास, बार्शी थांबा कायम होण्याची शक्यता वाढेल, असे बार्शी रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.
