नवे पोलीस आयुक्त अमितेश कुमार : आयुक्तालयात बोलावून घेतली हजेरी
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : पुण्यातील कुख्यात गुंडांच्या उदात्तीकरणाचे व्हिडिओ व्हायरल होत असल्याच्या पार्श्वभूमीवर तसेच गँग वॉर सुरु असताना पुण्याचे नवे आयुक्त अमितेश कुमारांनी पुण्यातील कुप्रसिद्ध सर्व गुंडांना कमिशनर ऑफीस येथे बोलावून समज दिली आहे.त्यामुळे पुण्यातील गुंडाराज संपून पोलीसराज सुरु होणार का?असा प्रश्न वजा विश्वास पुणेकर नागरीक व्यक्त करीत आहेत.
अमितेश कुमारांनी दलेल्या आदेशानुसार पुण्यातील सर्व गँगच्या कुख्यात गुंडांसह त्यांच्या सुमारे 267 सहकाऱ्यांची हजेरीच घेण्यात आली आहे. त्यामुळे पुण्यात गुंडाराज संपून पुन्हा पोलिसराज सुरु होणार असल्याची आशा व्यक्त केली जात आहे. शहरातील गुन्हेगारांना आणि गुंडाच्या टोळ्याना चाप लावण्यासाठी नवीन पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. गुन्हेगारी टोळ्या आणि सराईत गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश गुन्हे शाखेला दिले आहेत. त्या पार्शवभूमीवर कुख्यात गुंड गजानन मारणे, नीलेश घायवळ, बाबा बोडके, बंडू आंदेकर, टिपू पठाण, कंचीले अशा प्रमुख 15 गुन्हेगारी टोळ्यांसह नव्या उभरत्या 50 टोळ्यांतील सुमारे अडीचशेहून अधिक सराईत गुन्हेगारांना पोलिस आयुक्तालयात हजेरीसाठी बोलावण्यात आले होते.
कोणताही गुन्हा करायचा नाही. गुन्हेगारीस प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पाठिंबा द्यायचा नाही. बेकायदेशीर कृत्यात सहभागी व्हायचे नाही, सोशल मीडियावर व्हिडिओ किंवा रील्स टाकायच्या नाहीत. राहण्याचा पत्ता किंवा मोबाईल बदलल्यास तो क्रमांक बदलल्याची माहिती पोलिस ठाण्यात किंवा गुन्हे शाखेच्या युनिटला हजर राहून कळवावी, अन्यथा गुन्हा दाखल करण्यात येईल, असे इशारे आणि सूचना देण्यात आल्या आहेत. याप्रसंगी गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक पोलिस आयुक्त सुनील तांबे, सहायक आयुक्त सतीश गोवेकर उपस्थित होते.
पोलीस आयुक्तानी गुंड टोळ्यांच्या विरोधात जे पाऊल उचलले आहे त्याचे सर्वत्र स्वागत होत आहे. पुण्यात गुन्हेगारी वाढते आहे. पोलीस आक्रमक झाले तर गुंडाच्या टोळ्या निष्प्रभ होतील आणि गुंडाराज संपून कायदा सुव्यवस्था प्रस्थापित होईल अशी आशा वर्तवली जात आहे. जमिनीच्या वादातून शहरात गुन्हेगारीच्या घटना वाढत आहेत. पाच जानेवारी रोजी कोथरूड परिसरात गुंड शरद मोहोळ याचा गोळ्या घालून खून करण्यात आला होता. इतरही अनेक गुन्ह्याच्या घटना वाढत आहेत.
कोयता गँग वाढत आहेत. अशा परिस्थितीत पुण्यातील 15 गुन्हेगारी टोळ्यांसह नव्या 50 टोळ्यांतील सुमारे अडीचशेहून अधिक सराईत गुन्हेगारांची हजेरीच नवे आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशाने घेतली असल्याने या गुन्हेगारांना एक स्पष्ट मेसेज दिला आहे.पोलीस आणी पुण्यातील गुंड यांच्या मध्ये राजकीय हस्तक्षेप न झाल्यास पुणे देशातील सर्वात शांत व सुरक्षीत शहर बनेल यात शंका नाही.
