महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल
भूम : धाराशिव जिल्ह्यात विविध घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे विविध प्रश्न हाताळण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी धाराशिव जिल्ह्यात 15/2/2024 ते 15/3/2024 रोजी पर्यंत मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37( 1 ) (3)अन्वये शस्त्र व जमावबंदी आदेश लागू करण्यात येत असल्याचे अप्पर जिल्हा दंडाधिकारी यांनी पत्राद्वारे कळविले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज जयंती, महाशिवरात्र, रोहिदास महाराज जयंती उत्सव, महालक्ष्मी देवी मंदिरची यात्रा आयोजन, शब ए बरात असे कार्यक्रम, उच्च माध्यमिक प्रमाणपत्र व माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा तसेच जिल्ह्यात राजकीय सामाजिक घडामोडी सकल मराठा समाज, ओबीसी समाज आरक्षण संबंधाने मोठ्या प्रमाणात बैठका, सभा, मोर्चे, धरणे आंदोलन, रास्ता रोको, उपोषणे करण्यात येत आहेत.
शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्या व्यतिरिक्त कोणतीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी त्यांच्याजवळ शस्त्रकाठी, तलवार, बंदुका बाळगणार नाहीत. लाठ्या किंवा काठ्या शारीरिक इजा होण्यास कारणीभूत ठरतील, सहज हाताळता येतील अशा वस्तू जवळ बाळगणार नाहीत.
कोणत्याही क्षारक पदार्थ, स्फोटक द्रव्य जवळ बाळगणार नाहीत. सभ्यता, नीतिमत्ता यास बाधा येईल किंवा अराजक माजेल अशी चिन्हे, निशाणी, घोषणा, फलक किंवा अशी कोणतीही वस्तू जवळ बाळगणार नाहीत किंवा ठेवणार नाहीत.
व्यक्ती किंवा समूहाच्या भावना जाणून बुजून दुखावतील या उद्देशाने वाद्य वाजणार नाहीत किंवा असभ्य वर्तन करणार नाहीत. पाच किंवा पाच पेक्षा अधिक व्यक्ती रस्त्यावर जमण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
हा आदेश कामावरील कोणतेही पोलीस अधिकारी शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांना विशेष रित्या परवानगी दिलेल्या मिरवणूकिला लागू होणार नाही. असे अप्पर दंडाजिल्हाधिकारी धाराशिव यांनी पत्राद्वारे कळविले आहे.
