महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल
भूम : मराठा आरक्षणासाठी भुम येथील मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी गेल्या २० तासापासुन रस्ता रोको आंदोलन सुरू केले आहे. रात्री कार्यकर्त्यांनी तेथेच मुक्काम केला आणि सकाळी आंघोळी तेथेच केल्या आहेत.
उपोषणाला बसलेले मनोज जरांगे – पाटील यांची तब्येत खालावत चालल्याने संतप्त झालेल्या सकल मराठा समाजबांधवांनी गुरुवारी येथील गोलाई चौकात विविध घोषणा देत रास्ता रोको आंदोलन करून सरकारच्या नावाने बोंब ठोकली.
जरांगे-पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण द्यावे, यासाठी आंदोलन सुरू केल्यापासून शहरासह तालुक्यातील समाजबांधव या आंदोलनात सहभागी झाले आहेत. तालुक्यातील अंतरगाव येथे महादेव गोरे हे देखील आमरण उपोषणाला बसले आहेत.
आजवर शांततेत सुरू असलेले आंदोलन जरांगे – पाटील यांची तब्येत अधिकच खालावत चालल्याने तीव्र होताना दिसत आहे. गुरूवारी येथील गोलाई चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
तसेच आरक्षणाबाबत सरकारने तातडीने निर्णय जाहीर न केल्यास सार्वजनिक आत्मदहनाचा इशारा देण्यात आला. दरम्यान, आंदोलन सुरू असताना गोलाई चौकाच्या चारही बाजूने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
आंदोलन सुरू होताच आगाराकडून बसफेऱ्याही बंद करण्यात आल्या. “जीवाची बाजी लावून समाजासाठी लढणारा माणूस कित्येक वर्षांनंतर आज मिळाला आहे.
जरांगे – पाटील यांच्या केसाला धक्का लागला तरी सरकारमधील एकाही नेत्याला रस्त्यावर तर दूरच, घरात जाऊन समाज जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. जोपर्यंत सरकार आरक्षणाबाबत तातडीने निर्णय घेत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील, असा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला.
आंदोलनस्थळी पोलिस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी समाजबांधवांना आंदोलन शांततेत सुरू ठेवण्याचे आवाहन केले.
