सुभाषनगर परिसरातील घटना
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ
बार्शी : सुभाषनगर परिसरातील बंद किराणा व भुसार दुकानावरील पत्रे उचकटून चोरट्यांनी ६६ हजार ४५० रुपयांचे ३१ पोती धान्य चोरून नेल्याची घटना घडली.
ही चोरीची घटना पहाटेच्या सुमारास घडली. याबाबत व्यापारी रोहन लक्ष्मीकांत जाजू (वय ३६, रा. आगळगाव रोड, बार्शी) यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली असून पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिस सूत्राकडील माहितीनुसार फिर्यादी रोहन जाजू यांचे सुभाषनगर भागात आगळगाव रोडवर श्रीकृष्ण किराणा व भुसार दुकान आहे. दिवसभर व्यवसाय करून रात्री दुकानाचे शटर्सला कुलूप लावून ते गेले होते.
दुसऱ्या दिवशी सकाळी दुकान उघडायला आले असता वरील पत्रे उचकटलेले दिसून आले. दुकानात ठेवलेले तांदूळ, गहू, डाळीची पोती जागेवर दिसली नाहीत, या चोरीत २५ पोती तांदूळ, दहा पोती गहू, सहा पोती तूर, मूगदाळसह ३१ पोती धान्य चोरट्यांनी लंपास केले.
दुकानाची तपासणी करून पोलिसात धान्याची पोती चोरीस गेल्याची तक्रार दिली. पुढील तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल शैलेश चौघुले करीत आहे.
