नागरीकांनी नळ कनेक्शनला तोटी बसवण्याचे आवाहन
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ
बार्शी : तीव्र पाणी टंचाई निर्माण झालेली असल्याने नागरीकांनी नळ कनेक्शनला तोटी बसवावी असे आवाहन बार्शी नगर परिषदेचे मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण यांनी केले आहे.
या संदर्भात मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पाणी पुरवठा अभियंता अजय होनखांबे यांनी कळवले आहे कि शहरातील बहुतांश भागामध्ये नळ कनेक्शनला तोटी न बसविल्याचे निर्दशनास आलेले असून त्यामुळे.
शहरामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत आहे. तसेच सध्या तीव्र पाणी टंचाई निर्माण झालेली असून तांत्रिक कारणास्तव पाणी पुरवठा करण्यास मोठ्या अडचणी निर्माण होत आहे. तसेच बरेच नागरिक हे नळास डायरेक्ट विद्युत मोटारी लावुन पाणी खेचत असलेमुळे बऱ्याच भागांमध्ये असमान पाणी पुरवठा होत असलेच्या नागरिकांच्या तक्रारी या कार्यालयाकडे वारंवार प्राप्त होत आहेत.
तरी आपण आपल्या नळ कनेक्शनला तोटी 7 दिवसाच्या आतमध्ये बसवुन घेण्यात यावी. तसेच जे नळ कनेक्शनधारक हे नळास डायरेक्ट मोटार लावतील व ज्या भागाचा पाणी पुरवठा चालू आहे त्या ठिकाणी रोडवर पाणी मारणे, गाड्या धुणे, संडासमध्ये पाणी सोडणे असे प्रकार दिसून आल्यास अशा नागरिकांचे नळ कनेक्शन कोणतीही पुर्व सूचना न देता बंद करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे.
