महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ
सोलापूर : सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात पोलीस आयुक्तालय हद्द वगळून सर्वत्र मनाई आदेश लागू करण्यात आला. शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून ६ एप्रिल २०२४ सकाळी ८ वाजल्यापासुन ते २० एप्रिल २०२४ रात्री ८ वाजेपर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आलेले आहेत. अपर जिल्हादंडाधिकारी मनिषा कुंभार यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.
या आदेशानुसार शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, सुरे, झेंडा लावलेली काठी किंवा शरीरास इजा करण्याकरिता वापरता येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे, कोणताही ज्वालाग्राही अगर स्फोटक पदार्थ वाहून नेणे, दगड किंवा फेकावयाची उपकरणे, व्यक्ती अगर त्यांची प्रेत यात्रा, प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे, सार्वजनिक घोषणा करणे, असभ्य हावभाव करणे, ग्राम्य भाषा वापरणे, सभ्यता अगर निती विरुध्द निरनिराळ्या जाती जमातीच्या भावना दुखावल्या जातील, त्यामुळे त्यांच्यात भांडणे बखेडे निर्माण होऊन शांततेस बाधा होईल अशी कृती करणे, सोंगे अगर चिन्हे कोणताही जिन्नस तयार करुन त्याचा प्रसार करण्यास मनाई करण्यात येत आहे.
हा आदेश अत्यावश्यक सेवा, तसेच सरकारी नोकरांना त्यांची कर्तव्ये अधिकार बजाविताना वस्तू हाताळाव्या लागतात त्यांना आणि जिल्हादंडाधिकारी, पोलीस अधीक्षक (ग्रा.), उपविभागीय दंडाधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक, दुय्यम पोलीस निरीक्षक यांनी दिलेल्या परवानगीस लागू होणार नाहीत.
