महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ
बार्शी : पहाटेच्या वेळी पिक अप जीव अंगावर घालून जीवे मारल्याच्या आरोपात सबळ पुराव्यांअभावी आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
वहशिवणे, ता. करमाळा, जि. सोलापूर येथील विजय बाबु काकडे हे पहाटे फिरायला गेले असतांना त्यांच्या अंगावर आरोपी अक्षय उत्रेश्वर ढावरे यांनी पिक अप जीप घातली आणि जोराची धडक देवून जिवे ठारले असा आरोप ठेवण्यात आला होता.
यातील मयत विजय बाबू काकडे व आरोपी अक्षय उत्रेश्वर ढावरे या दोघांचे गावातील एक महिलेबरोबर प्रेमसंबंध होते व या कारणावरुन मयत विजय काकडे व आरोपी अक्षय ढावरे यांच्यात बऱ्याचवेळा वाद झाला होता व त्या भांडणात माझ्याकडे जीप आहे, ती जीप अंगावर घालून तुला खलास करतो अशी धमकी आरोपीने घटनेपुर्वी ४-५ दिवस अगोदर काकडे यांना दिली होती.
पहाटे नियमितपणे वडशिवणे ते केम रोडने फिरण्यास गेले असताना फिर्यादी सोमनाथ निळु लोंढे यास एक इसम जखमी अवस्थेत रोडच्या बाजूला पडलेला दिसला. म्हणून निळु लोंढे याने त्यांचा मित्र राष्ट्रपाल उघडे यांना फोन करुन बोलविले.
जखमी असलेला इसम विजय बाबु काकडे असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर निळु लोंढे यांनी करमाळा पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. आरोपी अक्षय उत्रेश्वर ढावरे यास अटक करुन तपास पुर्ण करुन आरोपी विरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले.
या केसची सुनावणी बार्शी येथील मे. ‘सेशन्स जज्ज सो, जे.सी. जगदाळे यांच्या कोर्टात झाली व सरकार पक्षातर्फे आरोपीवर गुन्हा शाबीत करणेसाठी फिर्यादी सोमनाथ लोंढे, महिला शितल लोंढे, राष्ट्रपाल उघडे, मयताची मुलगी, पत्नी, जीप मालक सोमनाथ मगर इत्यादी १० साक्षीदारांच्या साक्षी नोंदविल्या.
आरोपीची सबळ पुराव्या अभावी मुक्तता करावी हा युक्तिवाद ग्राह्य मानून आरोपी अक्षय ढावरे यांची खुनाचे आरोपातून सबळ पुराव्याच्या अभावी निर्दोष मुक्तता केली, यात आरोपी तर्फे अॅङ सुभाष जाधवर, अॅड तेजस जाधवर तर फिर्यादी सरकारपक्षातर्फे मूळ फिर्यादी तर्फे नागराज शिंदे, विशेष सरकारी वकील शांतिवर महिंद्रकर, सरकारी वकिल दिनेश देशमुख यांनी काम पाहिले.
