संगीता बर्वे, अ. ल. देशमुख, इंद्रायणी पाटील, प्रभाकर भोसले, प्रतिभा चंद्रन यांना पुरस्कार प्रदान
महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे : समर्पित आणि ध्येयाने जगणाऱ्या माणसांचे आयुष्य दीपस्तंभासारखेच असते असे प्रतिपादन ज्येष्ठ संपादक व विचारवंत विजय कुवळेकर यांनी व्यक्त केले.
ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत, लेखक आचार्य डाॅ. माधव पोतदार यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्ताने शब्दसारथीच्या वतीने आयोजित केलेल्या उत्कृष्ट कर्तृत्व गौरव प्रदान सोहळ्यात ते बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर विशेष अतिथी म्हणून माजी आमदार उल्हास पवार उपस्थित होते. अध्यक्षस्थानी विजय कुवळेकर होते.
साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी डाॅ. संगीता बर्वे, शिक्षण क्षेत्रातील योगदानासाठी डाॅ. अ. ल. देशमुख, शाहिरी परंपरेतील योगदानासाठी इंद्रायणी पाटील, पत्रकारितेतील योगदानाबद्दल प्रतिभा चंद्रन आणि कला क्षेत्रातील योगदानासाठी प्रभाकर भोसले यांचा उत्कृष्ट कर्तृत्व गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ आणि डाॅ. माधव पोतदार यांनी लिहिलेली पुस्तके असे पुरस्काराचे स्वरूप होते. कुवळेकर म्हणाले, चांगले काही करणारी माणसं झपाटल्यासारखी काम करणारी असतात. डाॅ. माधव पोतदार यांनी त्याच ऊर्मीने आयुष्यभर लेखनसाधना केली. जिथे जिथे कमी आहे असे जाणवले तिथे स्वतः उभे राहून धावले. शिक्षणसंस्था स्थापन केल्या.
दोन हजार महिलांना पदवीधर केले. १८३ पुस्तकांचे लेखन केले. तीच प्रेरणा घेऊन आज त्यांनी ज्या ज्या क्षेत्रात काम केले त्या क्षेत्रातील व्यक्तींचा गौरव करण्याची कल्पना स्तुत्य असून त्यांना हीच योग्य आदरांजली आहे.
उल्हास पवार म्हणाले, खऱ्या अर्थाने बहुआयामी म्हणावे असे व्यक्तिमत्त्व म्हणजे डाॅ. माधव पोतदार हे व्यक्तिमत्त्व होते. डाॅ. माधव पोतदारांसारख्या समर्पित व्यक्तींनी डोंगराएवढे उभे केलेले काम पाहून थक्क व्हायला होते.
आजच्या काळामध्ये अशाच आदर्शांची समाजाला गरज आहे. स्प्रिहा वस्ते या बालचित्रकाराने काढलेल्या चित्राचे अनावरण यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. पुरस्कारप्राप्त सर्व मानकऱ्यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक डाॅ. मनिषा पोतदार यांनी केले. सूत्रसंचालन शब्दसारथीचे संचालक पराग पोतदार यांनी केले. स्वप्नगंधा वस्ते यांनी आभार मानले.
एकाच दिवशी पाच पुस्तकांचे प्रकाशन! १८३ पुस्तकांचे लेखन करणाऱ्या साहित्यिकाला आदरांजली वाहण्यासाठी ती शब्दांनीच वाहावी या भूमिकेतून पोतदार कुटुंबातील प्रत्येक सदस्याने पुस्तक लिहून त्यांना आदरांजली वाहिली आणि या पुस्तकांचे प्रकाशन या सोहळ्यात करण्यात आले. डाॅ. माधव पोतदार यांनी लिहिलेल्या ‘इथे झुकावा माथा’, पत्नी डाॅ. मनिषा पोतदार यांनी लिहिलेल्या ‘परंपरा-देणं संस्कृतीचं’, मुलगा पराग पोतदार यांनी लिहिलेल्या ‘शोध एका वादळाचा’, सून प्रीती पोतदार यांनी लिहिलेल्या ‘माझं गाव माझी माणसं’ आणि नातू मानस पोतदार यांनी लिहिलेल्या ‘शिवतेज-ते साठ’ या पुस्तकांचे प्रकाशन यावेळी विजय कुवळेकर आणि उल्हास पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
