महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे : आनंदी आणि शांततापूर्ण समाजाच्या निर्मितीसाठी कुटुंब व्यवस्था टिकवणे आजच्या काळात खूप गरजेचे आहे. कुटुंब हा व्यक्ती आणि समाज यांना जोडणारा प्रमुख दुवा आहे. कुटुंब व्यवस्था चांगली राहिली तर एकूण समाज चांगला राहू शकेल, असे प्रतिपादन घोर तपस्वी प. पु. प्रवीणऋषिजी म. सा. यांनी केले.
गोयल गार्डन इथे प. पु. प्रवीणऋषिजी म. सा. यांची महावीरगाथा ही प्रवचनमाला गेल्या पाच दिवसांपासून सुरू आहे. प. पु. प्रवीणऋषिजी म. सा. यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या प्रसंगी सकल जैन संघाचे विजयकांत कोठारी, अनिल नहार, पोपटलाल ओस्तवाल, विलास राठोड, बाळासाहेब धोका उपस्थित होते.
प. पु. प्रवीणऋषिजी म. सा. म्हणाले, जर समाजाला चांगले स्वस्थ ठेवायचे असेल तर आपली कुटुंबव्यवस्था चांगली असणे गरजेचे आहे. पन्नास वर्षांपूर्वी ही व्यवस्था एकदम भक्कम होती. कुटुंबात परस्परांमध्ये प्रेम होते. पण आज आपण म्हणतो की तरुणाई व्यसनाधिनेतेकडे वळते आहे, किंवा वाईट सवयी त्यांना लागत आहेत. त्यालादेखील आपली कुटुंब व्यवस्थाच जबाबदार आहे.
घरात जर चांगले संस्कार नसतील, घरात वागणूक चांगली नसेल तर मुलेही चुकीच्या मार्गाला लागतात. त्याउलट घर जर चांगले असेल घरातील तरुणही सुसंस्कारित राहतात आणि चांगल्या कामात स्वतःला गुंतवून घेतात. त्यामुळे कुटुंब चांगले राहिल हेच प्रथमतः पाहायला हवे. कुटुंब व्यवस्था भक्कम राहणे ही काळाची गरज आहे.
ते पुढे म्हणाले, मनुष्याच्या जीवनातील समस्या शाश्वत असतात. काळ बदलला तरी समस्या तशाच राहतात. शेकडो वर्षांपूर्वीही हिंसाचार, माणसामाणसातील वागणे असेच होते आजही तसेच आहे. शाश्वत समस्येचे शाश्वत समाधान आपल्या महानतम विचारांमध्ये सापडते. ते आपल्याला फक्त ‘डि कोड’ करता यायला हवे. हिंसक भावना ही शाश्वत आहे.
परंतु त्यावर काय करायला हवे जे विचार महावीरांनी सांगितलेले आहेत त्यातूनच आपल्याला वाट मिळू शकते. आजच्या संदर्भात हेच महावीरांचे विचार ‘डि कोड’ करून आपण जगाला सांगितले पाहिजेत. त्यातून पुढे कसे जायचे याची दिशा मिळू शकते.
केवळ मीच खरा आहे असा अभिनिवेश ठेवण्यापेक्षा समोरच्याचेही म्हणणे मी ऐकून घेतो हा अनेकांतवाद महत्त्वाचा आहे. जीवनात वैविध्य असते तसे ते विचारांत आणि भूमिकेतही असू शकते. अहिंसा, अनेकांतवाद आणि अपरिग्रह या तीन गोष्टी आपल्या व्यक्तिगत पातळीवर, कौटुंबिक पातळीवर, समाजाच्या पातळीवर आणि देशाच्या पातळीवर महत्त्वाच्या आहेत.
या सगळ्याची एक व्यवस्था सामाजिक व देशपातळीवर निर्माण होणे गरजेचे आहे. कार्ल मार्क्सने एक व्यवस्था आखून दिली म्हणून लेनिन यशस्वी झाला हे आपण समजून घेतले पाहिजे. व्यवस्थेचे अधिष्ठान मिळणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात वारकरी संप्रदाय हा संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर यांच्या विचारांचे अधिष्ठान मानतो ही व्यवस्था आहे.
म्हणून वारकरी संप्रदाय टिकलेला आहे. आजच्या काळात महावीर स्वामी यांचा खणखणीत विचारच समाजाला जाग आणू शकतो. त्यासाठीच ही महावीर गाथा सर्वत्र सांगितली जाते आहे. त्यांच्या जीवनाचा आदर्श घेऊन आपण पुढे जायचे आहे.
धर्माधर्मातील वादांत अडकण्यापेक्षा आपल्या धर्माचा प्रसार आणि प्रचार अधिक चांगल्या प्रकाराने कसा करता येईल हेच पाहायला हवे. चांगल्या गोष्टीसुद्धा आहेत हे अनेकदा मार्केटिंग प्रभावी असेल तरच लोकांपर्यंत पोहोचते हे आपण लक्षात घ्यायला हवे असे प्रतिपादन प. पु. प्रवीणऋषिजी म. सा. यांनी केले.
