वृक्ष संवर्धन समितीच्या प्रयत्नांना यश
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ
बार्शी : वादळात उन्मळून पडलेल्या ३० वर्षापूर्वीच्या वडाच्या झाडाचे पुनरोपण करण्यात वृक्ष संवर्धन समितीच्या सदस्यांना यश आले आहे.
ते झाड जगू शकेल का यासाठी विविध तज्ञांचे मार्गदर्शन घेण्यात आले. परंतु ज्या भागात ते होते तेथील जमिनीच्या कठीणतेमुळे तिथे ते लावणे अवघड होते. त्यामुळे दुसऱ्या ठिकाणी ते पुनरोपण करण्याचे ठरवले. त्यासाठी शासकीय आयटीआय समोरील मैदान निवडण्यात आले.
परंतु हे आवाढव्य झाड त्या ठिकाणी नेहने आणि ते रोपण करणे ही सोपी गोष्ट नव्हती. परंतु वृक्ष संवर्धन समितीच्या सदस्यांनी मोठ्या कष्टाने उत्कृष्ट नियोजन करून ते झाड शासकीय खुल्या जागेत नेऊन यशस्वीरित्या लावले.
या कार्यात त्यांना पैकेकर कन्स्ट्रक्शनचे प्रशांत पैककर, मंदार कुलकर्णी, बार्शी नगरपालिकेतील कारकर पाटील, गौतम आठवले यांनी मोठी मदत केली. झाड क्रेनच्या सहाय्याने मोठ्या ट्रकमध्ये ठेवण्यात आणि ते झाड शासकीय आयटीआय समोरील खुल्या जागेत आणण्यात आले.
यावेळी छोटे रस्ते तसेच रस्त्यावरील वायरिंग यामुळे वृक्ष संवर्धन समितीच्या सदस्यांना मोठी कसरत करावी लागली. त्यानंतर क्रेनच्या साह्याने ते झाड खड्ड्यात ठेवण्यात आले व जेसीबीच्या साह्याने सुरुवातीला काळी माती लोटून त्यानंतर मुरूम खडक खत देखील झाडाच्या बुंध्यापाशी टाकण्यात आले.
त्यानंतर आणखीन एक टँकर पाणी झाडाला दिले आणि अशा रीतीने संपूर्ण दिवसाच्या अखंड परिश्रमानंतर वसुंधरा दिनाच्या पूर्व संध्येला झाड वाचवण्यात वृक्ष संवर्धन समितीच्या सदस्यांना यश आले.
त्यानंतर तेथे जमलेल्या वृक्षप्रेमींनी आणि वृक्ष संवर्धन समितीच्या सदस्यांनी आनंदोत्सव साजरा केला.
यावेळी बोलताना वृक्ष संवर्धन समितीचे राहुल तावरे यांनी सांगितले की सहा महिने देखरेख करून ते झाड जोपासण्यात येणार आहे. त्यासाठी योग्य खते तसेच औषधे देखील काही दिवसाच्या अंतराने या झाडांना देण्यात येणार आहेत.
हे कार्य यशस्वी करण्यासाठी राहुल तावरे, उमेश काळे, डॉ. सचिन चव्हाण, महेश पायघन, दीपक जाधव, महेश बकशेट्टी, सागर बिडवे, प्रज्वल मोरे, आनंद धुमाळ, रोहन अवताडे,संतोषकुमार गायकवाड, अक्षय भोईटे, गणेश घोलप, व्यंकटेश गायकवाड तसेच पैकेकर कन्स्ट्रक्शनचे कामगार आदींनी परिश्रम घेतले.
