महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ
बार्शी : सोमवार पेठेतील श्री. जैन श्वेतांबर ऋषभदेव जैन मंदिर स्थापनेला 100 वर्ष पूर्ण झाल्याने मंदिर ट्रस्ट व सकल जैन समाजाच्या वतीने ऋषभदेव शताब्दी महोत्सव ध्वज सोहळा व जैन तपस्वीच्या तप पारणे उपवासपूर्ती सोहळा जैन मंदिरात मोठ्या उत्साहात साजरा झाला.
या प्रसंगी परम पूज्य आचार्य श्री. विजय विज्ञानप्रभसूरीश्वरजी महाराज, परम पुज्य साध्वी वात्सल्यरत्नाश्रीजी आदि ठाणा व परम पुज्य साध्वी चैत्यरत्ना श्रीजी आदी ठाणा यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा संपन्न झाला.
ऋषभदेव जैन मंदिर शताब्दी मोहोत्सवा निमित्त बार्शीतील विमलचंदजी भिकमचंदजी राठोड परिवार यांनी मानाच्या ध्वजाची पूजा करून कळसावर ध्वज चढविला. तत्पूर्वी मंदिर परिसरात शताब्दी ध्वजाच्या प्रतिकृतीची ढोल ताशांच्या व बँड पथकाच्या गजरात सवाद्य मिरणूक काढून मंदिराला तीन प्रदक्षिणा घालण्यात आल्या.
यावेळी बार्शी व परगावाहून आलेले हजारो जैन समाज बांधव व महिला उपस्थित होत्या. त्यानंतर कांतीलाल शिवलाल मुनोत परिवार यांनी 87 जैन तपस्वीना उसाचा रस देऊन 14 महिन्यांच्या उपवासाची सांगता केली.
परम पूज्य आचार्य श्री. विजयविज्ञान प्रभसूरीस्वरजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शीत मागील १० दिवस मंदिरात तसेच सोलापूर रोडवरील सोनिग्रा प्लॉट या ठिकाणी वेगवेगळे संगीतकार बोलावून भक्ती संध्या सारखे विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले.
४०० दिवस उपवास केलेल्या ८७ जैन तपस्वींची शहरातील प्रमुख मार्गाने रथयात्रा काढण्यात आली. यावेळी फुलांनी आकर्षक सजविलेल्या ३० बग्गीत (रथ) जैन तपस्वी विराजमान झाले होते. रथ यात्रेच्या अग्रभागी बैलगाडीत पाहिले तिर्थंकर श्री. ऋषभदेव यांची प्रतिमा ठेवण्यात आली होती.
समाजातील बाधवांनी चौकाचौकात पाणी, ज्युस, सरबत याचे वाटप केले, बार्शीच्या श्री जैन श्वेतांबर ऋषभदेव मंदिराला १०० वर्ष पूर्ण होऊन देखील कोरोनामुळे मागील ४ वर्षा पासून शतकपूर्ती मोहोस्तव रखडला होता तो आता यावर्षी पूर्ण होत आहे असा आनंद सर्व समाजातील युवकांनी व्यक्त केला.
श्री ऋषभदेव जैन मंदिर येथे महाआरती करून शताब्दी महोत्सव कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. हा उत्सव यशस्वी करण्याकरीता श्री ऋषभदेव जैन मंदिर ट्रस्ट, श्री गौतम संगीत मंडळ, श्री नाकोडा जैन सेवा मंडळ, श्री वर्धमान स्थानकवासी नवयुवक मंडळ, श्री माणिभद्रवीर संगीत मंडळ, श्री जैन संस्कार ग्रुप, श्री गिरिराज सेवा परिवार, श्री समरथ युवक मंडळ, श्री आनंदसागर सामायिक मंडळ, श्री आदिनाथ विहार ग्रुप, या मंडळांचे विशेष सहकार्य लाभले.
87 तपस्विनींच्या वर्षीतप उपवासाची सांगता – बार्शी शहरातील जैन समाजातील 87 तपस्विनी मागील 14 महिन्या पासून वर्षीतप उपवास केले. हे उपवास म्हणजे तपस्विनी एक दिवसाआड दोन वेळा अन्न ग्रहण केले.दुसऱ्या दिवशी कोमट पाणी घेउन सलग 14 महिने असे उपवास केले. यावर्षी अधिक महिना आल्याने 12 महिन्या ऐवजी 14 महिने उपवास करावे लागले, या तपस्वींचे ४०० दिवस श्री गौतम संगीत मंडळ यांनी सेवावृत्तीचे कार्य पार पाडले. या उपवासाची सांगता अक्षयतृतीयेला करण्याची जैन धर्मियांची परंपरा आहे. महाराजांच्या हस्ते उसाचा रस पिऊन सर्व 87 तपस्विनी आदी समर्पण वर्षीतप पारणा उत्सव साजरा केला.या संपुर्ण कार्यक्रमासाठी समाजातील अनेक दानदात्यांनी मोठ्या प्रमाणावर चढावे घेउन दान दिले. या सर्व दानदात्यांचा सन्मान स्व.बदामबाई हरीचंद्रजी श्रीश्रीमाळ यांच्या स्मरणार्थ त्यांची कन्या सौ.छायाबाई ताराचंद डुंगरवाल परिवार हस्ते अजित डुंगरवाल यांनी केला.
